मुंबई : कबुतरांमुळे फुप्फुसाचे गंभीर आजार होत असल्याचे निदर्शनास आल्यावरून न्यायालयाने ते हटवण्याचे आदेश दिलेले आहेत. पण हे कबुतरखाने हटवू नका अशी मागणी जैन समाजातून होत आहे. सरकार जाणीवपूर्वक अशा वादाला खतपाणी घालत आहे. भाजप युती सरकारचे काम म्हणजे आजारापेक्षा उपचार भयंकर असे आहे. राज्यात शेतकरी संकटात आहे, तरुण नोकऱ्या नाहीत, महागाई वाढलेली आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे यावरून जनतेचे लक्ष वळवण्यासाठी सरकारच असे वाद उकरून काढत आहे अशी टिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
दादरचा कबुतरखाना येथे झालेल्या आंदोलनात बाहेरचे लोक होते असे सांगितले जात आहे. पण हा सुद्धा बनाव आहे. राज्यात कोठेही काहीही घटना घडली की बाहेरच्या लोकांनी ती घडवून आणली हे ठोकळेबाज उत्तर देऊन सरकार आपले अपयश झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असते, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.