
मुंबई महापालिकेत कायमस्वरूपी कामगार भरती बंद करण्यात आली आहे; मात्र नोकरभरतीची बंदी लवकरच मागे घेत आरोग्य विभाग, लिपिकासह पाच हजार कामगारांची भरती करण्यात येणार असल्याचा दावा कामगार संघटनांनी केला आहे.
वाढत्या महागाईची झळ मुंबई महापालिकेलाही बसली आहे. आर्थिक कोंडी पाहता ऑक्टोबर २०१९मध्ये नोकरभरती बंद करण्याबाबतचे परिपत्रक पालिकेने काढले होते, तसेच फेब्रुवारी २०२०च्या अर्थसंकल्पात आर्थिक स्थितीत सुधारणा होईपर्यंत, नोकरभरती बंद करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यावेळी लिपिकांच्या ८१० पदांच्या भरतीचा प्रस्ताव मागे घेण्यात आला होता. त्यानंतर गेल्या तीन वर्षांत पालिकेत भरती झालेली नाही. कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी बुधवारी पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्या समवेत कामगार संघटनांची बैठक झाली. या बैठकीत नोकरभरतीचा प्रश्न उपस्थित झाला.
या बैठकीला कामगारनेते बाबा कदम, वामन कविस्कर, दिवाकर दळवी, बा. शी. साळवी, सत्यवान जावकर, शेषराव राठोड, संजीवन पवार, के. पी. नाईक व के. एल. सिंग, साईनाथ राजाध्यक्ष, यशवंत धुरी, तसेच अतिरिक्त आयुक्त आशिष शर्मा, अश्विनी भिडे, डॉ. संजीव कुमार, सह आयुक्त मिलिन सावंत, प्रमुख कामगार अधिकारी सहदेव मोहिते उपस्थित होते.