Mumbai : उष्माघातामुळे मुलांमध्ये डिहायड्रेशन; हीट स्ट्रोकचा वाढता धोका, डॉक्टरांचा इशारा

देशातील अनेक भागांमध्ये तापमान सातत्याने वाढत असून काही ठिकाणी पारा ४५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवला जात आहे. अशा परिस्थितीत डॉक्टरांनी पालकांना २५ मे ते २ जून या नौतपा काळात लहान मुले आणि बालकांची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. तीव्र उष्णतेमुळे मुलांमध्ये डिहायड्रेशन, उष्माघात (Heat Stroke) आणि इतर गंभीर आरोग्य समस्या उद्भवण्याचा धोका वाढत असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
Mumbai : उष्माघातामुळे मुलांमध्ये डिहायड्रेशन; हीट स्ट्रोकचा वाढता धोका, डॉक्टरांचा इशारा
'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

भाईंंदर : देशातील अनेक भागांमध्ये तापमान सातत्याने वाढत असून काही ठिकाणी पारा ४५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवला जात आहे. अशा परिस्थितीत डॉक्टरांनी पालकांना २५ मे ते २ जून या नौतपा काळात लहान मुले आणि बालकांची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. तीव्र उष्णतेमुळे मुलांमध्ये डिहायड्रेशन, उष्माघात (Heat Stroke) आणि इतर गंभीर आरोग्य समस्या उद्भवण्याचा धोका वाढत असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

भाईंदर परिसरातही उष्णतेचा प्रभाव जाणवत असून, नवजात बालके आणि सहा वर्षांखालील मुले सर्वाधिक धोक्यात असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई, वीज कपात तसेच उष्माघात व डिहायड्रेशनच्या रुग्णांमध्ये वाढ दिसून येत आहे. मीरारोड येथील वोक्हार्ट रुग्णालयातील तज्ज्ञांच्या मते, लहान मुलांचे शरीर प्रौढांच्या तुलनेत तापमान नियंत्रित करण्यात कमी सक्षम असते. त्यामुळे त्यांना उष्णतेशी संबंधित आजारांचा धोका अधिक असतो. दररोज ३ ते ४ लहान मुलांवर अशा प्रकारच्या लक्षणांसाठी उपचार केले जात असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.

तीव्र उन्हाळ्यात नवजात व लहान मुले सर्वाधिक धोक्यात असतात. या काळात शरीरातील पाण्याची कमतरता टाळण्यासाठी वारंवार द्रवपदार्थ देणे आवश्यक आहे. स्तनपान करणाऱ्या मातांनी बाळांना अधिक वेळा दूध पाजावे, कारण आईचे दूध पोषणासोबत शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यास मदत करते.

मुलामध्ये सतत ताप, सुस्ती, उलट्या, दूध किंवा अन्न कमी घेणे किंवा डिहायड्रेशनची लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे मीरारोड येथील कन्सल्टंट निओनेटोलॉजिस्ट, बालरोगतज्ज्ञ आणि लॅक्टेशन कन्सल्टंट डॉ. नीतू मुंधरा यांनी सांगितले. डॉ. मुंधरा यांनी मुलांना हलक्या रंगाचे व सैल सूती कपडे घालण्याचा, नियमित पाणी व द्रवपदार्थ देण्याचा तसेच स्वच्छता राखण्याचा सल्ला दिला आहे. नियमित अंघोळ, गर्दीच्या ठिकाणांपासून दूर राहणे आणि शरीराच्या तापमानावर लक्ष ठेवणे यामुळे उष्णतेशी संबंधित आजारांचा धोका कमी होऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

उष्णतेमुळे दिसणारी प्रमुख लक्षणे

अतिप्रमाणात घाम येणे, चिडचिड होणे, ओठ कोरडे पडणे, लघवी कमी होणे, उलट्या होणे, चक्कर येणे, जास्त झोप येणे, जलद श्वास घेणे आणि शरीराचे तापमान वाढणे ही उष्माघाताची प्राथमिक लक्षणे आहेत. डॉक्टरांनी पालकांना दुपारी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत मुलांना बाहेर नेणे टाळावे आणि त्यांना थंड व हवेशीर वातावरणात ठेवावे, असा सल्ला दिला आहे.

हीट स्ट्रोकची चेतावणी देणारी लक्षणे

जास्त ताप येणे, त्वचा कोरडी, लालसर आणि गरम होणे, चक्कर येणे, गोंधळ किंवा तीव्र सुस्ती, जलद श्वास घेणे, अनियमित हृदयाचे ठोके, वारंवार उलट्या होणे किंवा पाणी पिण्यास नकार देणे अशी लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय मदत घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जनजागृती, वेळेवर उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय हेच तीव्र उन्हाळ्यात मुलांचे संरक्षण करण्याचे सर्वात प्रभावी मार्ग आहेत.

logo
marathi.freepressjournal.in