ठाणे, मुंबई आणि उपनगरात मुसळधार पाऊस पडत आहे. नवी मुंबई, ठाणे परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे. सायंकाळी अचानक आलेल्या पावसाने कार्यालयातून घरी जाणाऱ्या नोकरदार वर्गाची तारांबळ उडाली आहे. ठाणे शहराला पावसाने झोडपून काढले आहे. सायंकाळी साडेपाच ते साडेसहा या एका तासात ७१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
ठाणे, कळव्यात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने सीएसएमटी ते ठाणे आणि दिवा, डोंबिवली, कल्याण या भागांमध्ये लोकल उशिराने धावत आहेत. टिटवाळा ते आंबिवली दरम्यान मालगाडीत तांत्रिक बिघाड झाल्याने कल्याण ते कसारा वाहतूक अर्धा तास ठप्प झाली होती. याचा परिणाम वेळापत्रकावरही झाला आहे. मुंब्रा कळवा परिसरात मुसळधार पावसामुळे पारसिक डोंगरातून पाण्याचे मोठे नाले थेट रेल्वे रुळांवर आले. मध्य रेल्वेच्या ट्रॅकच्या बाजूला पारसिकचा डोंगर असल्याने हे पाणी थेट रुळावर येत होते. पाऊस कमी झाल्याने पाणी कमी झाले. मात्र यामुळे मध्य रेल्वेच्या तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकवरील वाहतूक 15 ते 20 मिनिटे बंद होती. पाणी ओसरल्याने वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे.