मुंबई आणि उपनगरात सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. तसेच मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर काही अंशी परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. ठाणे स्थानकावर लोकलमध्ये तांत्रिक बिघाड सकाळच्या वेळेस आढळून आला.
पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली आणि उपनगरात मुसळधार पाऊस पडत आहे. मध्य, हार्बर लोकल उशिराने धावत आहेत. पश्चिम रेल्वेची वाहतूक त्यामानाने सुरळीत सुरू आहे. ठाणे रेल्वे स्थानकावरील रुळांवर काही प्रमाणात पाणी साचले होते.
दरम्यान, जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू असलेला मुसळधार पाऊस अद्याप थांबलेला नाही. पालघर, रायगड, नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूरमध्ये आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, कोकण आणि विदर्भात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पावसामुळे राज्यभरातील धरणांच्या पाण्याची पातळी वाढत आहे. त्यामुळे धरणांचे दरवाजे उघडून तासाभरात विसर्ग वाढवला आहे. त्यामुळे नदीकाठावर राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. लोणावळ्यातील पर्यटकांची वाढती वर्दळ लक्षात घेता प्रशासनाने भुशी धरणात सायंकाळी ५ नंतर प्रवेश बंदी घातली आहे. सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.