मुंबई : आयुष्याच्या सायंकाळी शांततेने जगण्याचा ज्येष्ठ नागरिकांना मूलभूत अधिकार आहे, असे नमूद करीत उच्च न्यायालयाने ज्येष्ठ नागरिक आणि मुलांच्या वादाच्या प्रकरणात निर्णय दिला आहे. ज्येष्ठ नागरिक हे त्यांच्या हक्काच्या घरातून मुलांना बाहेर काढण्याची मागणी करू शकतात, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला. वृद्ध आईला घरातून हाकलणाऱ्या मुलगा, सुनेला न्यायालयाने दणका दिला.
मुलुंड परिसरात राहणाऱ्या ७१ वर्षीय वृद्ध महिलेने मुलाने आणि सुनेने छळ केल्याची तक्रार 'देखभाल आणि कल्याण लवाद'कडे केली होती. मुलाने घराची मालकी आपल्या नावावर करण्यासाठी मारहाण केली. तसेच पत्नीच्या संगनमताने घराबाहेर काढले, असा आरोप वृद्ध महिलेने केला होता.
न्यायालयाचे निरीक्षण
ज्येष्ठ नागरिकांना शांततेत जगण्याचा अधिकार आहे. वृद्ध महिलेला तिच्या स्वतःच्या घरात शांततेत जगता यावे, यासाठी मुलांना घरातून बाहेर काढणे आवश्यक आहे. ज्येष्ठ नागरिकांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुरक्षित राखणे हा ज्येष्ठ नागरिक देखभाल आणि कल्याण कायद्याचा मूळ उद्देश आहे.