
मुंबई : २०१५ मध्ये कुर्ला येथील हॉटेल सिटी किनाऱ्यामध्ये लागलेल्या आगीत मृत्यू झालेल्या आठ जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी महापालिकेला दिले. मुंबई महापालिकेला आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात गंभीर अपयशाचा उल्लेखही न्यायालयाने यावेळी केला.
१६ ऑक्टोबर २०१५ रोजी कुर्ला येथील हॉटेल सिटी किनाऱ्याला लागलेल्या आगीत आठ जणांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी सातजण १८ ते २० वयोगटातील विद्यार्थी होते, तर आठवा ३१ वर्षीय विरारचा रहिवासी डिझाईन इंजिनिअर होता.
पीडितांच्या पालकांनी लोकायुक्तांच्या फेब्रुवारी २०१७ च्या आदेशाला आव्हान देत न्यायालयात याचिका दाखल केली होती. लोकायुक्तांनी त्यांच्या तक्रारी फेटाळून लावल्या होत्या आणि त्यावेळी केवळ प्रत्येकी १ लाख रुपयांची भरपाई दिली गेली होती. पालिकेने १२ आठवड्यांच्या आत मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची भरपाई द्यावी, असा आदेश खंडपीठाने दिला.
निष्काळजीपणा हेच कारण
कोर्टाने महापालिकेला जबाबदार धरताना म्हटले की, हॉटेलने परवान्याच्या अटींचा भंग केला होता. विशेषतः एका मजल्यावर स्टोरेज ऐवजी सेवा क्षेत्र चालवण्यात येत होते. याशिवाय हॉटेलकडे अग्निशमन विभागाचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्रही नव्हते. पालिकेकडून दाखवलेला निष्काळजीपणा आणि कायदेशीर जबाबदाऱ्या पार पाडण्याकडे केलेले दुर्लक्ष हेच आगीचे मुख्य कारण आहे.