
मुंबई : बारावी निकालात प्रावीण्यासह प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये मुंबईतील विद्यार्थ्यांनी आघाडी घेतली आहे. यानंतरही मुंबईतील महाविद्यालयीन प्रवेशाचा कट ऑफ घसरण्याची शक्यता आहे. मुंबई मंडळात प्रावीण्यासह प्रथम श्रेणीमध्ये ४२ हजार ४८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मात्र गतवर्षीच्या तुलनेत यंदा प्रावीण्यासह प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत ३ हजार ४९१ इतकी घट झाली आहे. यामुळे नामांकित महाविद्यालयांच्या प्रवेशाची कट-ऑफ घसरण्याची शक्यता आहे.
बारावी निकालानंतर मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये व मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये पदवीच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होईल. पारंपरिक व स्वायत्त संस्थांमधील विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस असते. मात्र प्रावीण्यासह प्रथम श्रेणी म्हणजेच ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेले विद्यार्थी आणि प्रथम श्रेणीमध्ये म्हणजेच ६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत गतवर्षीच्या तुलनेत घट झाली आहे. परिणामी काही नामांकित महाविद्यालये वगळता अन्य महाविद्यालयांमधील प्रवेशाच्या कट-ऑफवर होण्याची शक्यता आहे. गतवर्षी प्रावीण्यासह प्रथम श्रेणीमध्ये ४५ हजार ९७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. तर यंदा ४२ हजार ४८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे प्रावीण्यासह प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत गतवर्षीच्या तुलनेत ३ हजार ४९१ घट झाली आहे. गतवर्षी ६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ८७ हजार ५९ इतकी होती. तर यंदा ८४ हजार ६३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा २ हजार ४२७ घट झाली आहे.
मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये व संस्थांमध्ये प्रवेशासाठी साधारणपणे तीन लाख विद्यार्थी अभ्यासक्रमांसाठी सात लाखांपेक्षा जास्त अर्ज करतात. यामध्ये नामांकित महाविद्यालयांची कटऑफ ९० टक्क्यांहून अधिक असते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रवेशासाठी चुरस पाहायला मिळते. यंदा बारावीच्या निकालामध्ये प्रावीण्यासह प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत एकूण ५ हजार ९१८ घट झाली आहे.
विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सेवा
बारावी निकालानंतर काही विद्यार्थी नकारात्मक विचाराने मानसिक दडपणाखाली येण्याची शक्यता असते. त्यामुळे राज्यमंडळ स्तरावरुन अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी पुढील आठ दिवस ऑनलाइन समुपदेशन सेवा सुरू ठेवण्यात आली आहे. समुपदेशक परीक्षेच्या निकालाच्या दिवसापासून ८ दिवस सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनीद्वारे नि:शुल्क आवश्यक ते समुपदेशन करणार आहेत.
समुपदेशकांचे भ्रमणध्वनी
-९०११३०२९९७
-८२६३८७६८९६
-८७६७७५३०६९
-७३८७४००९७०
-९९६०६४४४११
-७२०८७७५११५
-८१६९२०२२१४
-९८३४०८४५९३
-८३२९२३००२२
-९५५२९८२११५