

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विधान परिषद सदस्य इद्रिस नायकवडी यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, यासाठी त्यांच्यावर पक्षाकडून दबाव असल्याची चर्चा आहे. पक्षाचे नेते आणि खासदार पार्थ पवार यांनी नायकवडी यांचा राजीनामा घेण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. मात्र नायकवडी यांनी राजीनाम्याबाबतच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. मात्र, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे ओएसडी आपल्याला भेटल्याचे त्यांनी मान्य केले आहे.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऑक्टोबर २०२४ मध्ये नायकवडी यांची विधान परिषदेत राज्यपाल नामनियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. विधान परिषदेत नियुक्ती होऊन जेमतेम दीड वर्ष होत नाहीत, तोच नायकवडी यांचा राजीनामा घेण्यात येणार असल्याची पक्षात चर्चा सुरू झाली आहे. सभागृहातील कामगिरी योग्य नसल्याचे कारण पुढे करून त्यांचा राजीनामा मागण्यात आल्याचे सांगण्यात येते.
मात्र, इद्रिस नायकवडी यांनी पक्षाने राजीनामा मागितल्याची चर्चा फेटाळून लावली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार किंवा पक्षाकडून मला अद्याप राजीनाम्याबाबत सांगितलेले नाही. प्रत्येक पक्षात असे काही लोक असतात, जे अशाप्रकारे चर्चा करत असतात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची उद्या बैठक आहे. या बैठकीत मी नक्कीच या चर्चांबाबत बोलेल. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे ओएसडी माझ्याकडे आले होते. माझा हात फ्रॅक्चर झाला होता, तेव्हा कोल्हापूर भागात ते होते म्हणून मला भेटायला आले होते, असे नायकवडी यांनी स्पष्ट केले.
मी राजीनामा देणार नाही
मला पक्षाकडून किंवा कुठल्याही नेत्याकडून तसे सांगण्यात आलेले नाही. तरीही उद्या पक्षाच्या बैठकीत मी याबाबत चर्चा करेल. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार असताना मधेच राजीनामा द्यावा लागेल, अशी कधीही चर्चा झाली नव्हती. मला आमदारकी देताना त्यांनी सांगितलं होतं की, ही संधी एकदाच आहे. आता, विधानसभेच्या तयारीला तुम्ही लागा, कारण भविष्यात विधानसभा लढवायची आहे. त्यामुळे मी राजीनामा देणार नाही, असेही नायकवडी यांनी स्पष्ट केले.