पहिल्याच पावसात मुंबईत झोपड्यांवर कोसळली दरड

गेल्या वर्षी पावसाळ्यात न्यू भारत नगर, वांझार दांडा येथे झोपड्यांवर दरड कोसळल्यानंतर १६ जण दगावले होते.
पहिल्याच पावसात मुंबईत झोपड्यांवर कोसळली दरड

वरुणराजाने मुंबईत हजेरी लावली असली तरी दमदार इनिंगला सुरुवात केलेली नाही. मात्र पावसाच्या पहिल्या इनिंगमध्ये चेंबूर वाशी नाका येथील डोंगर उतारावर असलेल्या झोपड्यांवर रविवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली. या दुर्घटनेत दोन गंभीर जखमी झाले असून त्यांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, गेल्या वर्षी पावसाळ्यात न्यू भारत नगर, वांझार दांडा येथे झोपड्यांवर दरड कोसळल्यानंतर १६ जण दगावले होते. तर ५ जखमी झाले होते.

चेंबूर- वाशीनाका येथील न्यू भारत नगर येथील काही झोपड्या डोंगर उतारावर वसल्या आहेत. दरवर्षी मुसळधार पावसांत येथील रहिवाशी जीव मुठीत घेऊन राहतात. डोंगराच्या भागाखाली असलेल्या या झोपड्यांचा परिसर बीआरसीच्या हद्दीत येतो. पाऊस कोसळायला सुरुवात झाली की, येथील डोंगरावरील मातीसह मोठे दगड झोपड्यांवर पडण्याचा धोका असतो. रविवारी पहाटे डोंगरावरील मोठा दगड उतारावर असलेल्या झोपडपट्ट्यांवर पडला. यात येथील रहिवासी अरविंद प्रजापती (२५) आणि आशिष प्रजापती (२०) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघेही भाऊ आहेत. या जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर अग्निशमन दलाने तात्काळ धाव घेऊन बचावकार्य सुरु केले. पहिल्या पावसांतच घडलेल्या या घटनेने येथील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in