
महाविकास आघाडीने गेल्या अडीच वर्षांत मला संपवण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप गुरुवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. उद्धव ठाकरे यांचे गटप्रमुख मेळाव्यातील भाषण म्हणजे निराशेचे अरण्यरुदन होते, अशी टीकाही त्यांनी केली.
उद्धव ठाकरे यांनी बुधवारी फडणवीसांवर घणाघाती टीका करताना देवेंद्र फडणवीस यांच्या आयुष्यातली ही शेवटची निवडणूक असल्याचे म्हटले होते. याचा समाचार घेताना फडणवीस म्हणाले की, “कालचे भाषण हे नैराश्यातून होते. ही माझी शेवटची निवडणूक आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. महाविकास आघाडीने २०१९मध्ये माझा शेवट करण्याचा प्रयत्न केला; पण मला कोणीही संपवू शकत नाही.”
शिवसेना गटप्रमुखांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपला आव्हान देत म्हटले होते की, हिंमत असेल तर महिन्याभरात निवडणुका घ्या. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, “आम्ही कायदेशीरपणे निवडून आलो आहे. मात्र, ज्यावेळी आमच्यासोबत निवडून येऊन तुम्ही आमच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यावेळी तुम्ही राजीनामे का दिले नाहीत.’’