रेल्वे रूळावरील अपघातांच्या घटना सुरुच; सहा महिन्यांत ७१ प्रवाशांचा मृत्यू

रेल्वे प्रशासनाकडून स्थानकात सरकते जिने, लिफ्ट, पादचारी पूल यांसारख्या सुविधेत वाढ करण्यात येत आहे
रेल्वे रूळावरील अपघातांच्या घटना सुरुच; सहा महिन्यांत ७१ प्रवाशांचा मृत्यू
Published on

विविध सुविधा करूनही उपनगरीय रेल्वे मार्गावरील रेल्वे अपघातांच्या घटना थांबलेल्या नाहीत. दिवसागणिक अपघातांच्या घटनांमध्ये वाढच दिसत आहे. मध्य, पश्चिम रेल्वेसोबत एकट्या ट्रान्स हार्बर मार्गावर मागील सहा महिन्यांत अपघात आणि अन्य कारणांमुळे ७१ प्रवाशांचा मृत्यू झाला असून ५० प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती रेल्वे पोलिसांकडून देण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक मृत्यू रेल्वे रूळ ओलांडताना झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

कोरोना आटोक्यात येताच रेल्वेमधील प्रवासीसंख्येत वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून स्थानकात सरकते जिने, लिफ्ट, पादचारी पूल यांसारख्या सुविधेत वाढ करण्यात येत आहे; मात्र असे असले तरी प्रत्यक्षात रेल्वे अपघातांचे प्रमाण अद्याप कमी झालेले नाही.

उपनगरीय रेल्वे मार्गावरील ट्रान्सहार्बर मार्गावर प्रतिदिन लाखो प्रवासी प्रवास करतात; परंतु वारंवार प्रशासनाकडून आवाहन करूनही ट्रान्स हार्बर मार्गावर रेल्वे अपघातांचे प्रमाण वाढेल आहे.

आतापर्यंत जानेवारी ते जून या सहा महिन्यांत ट्रान्सहार्बर मार्गावर झालेल्या अपघातांमध्ये सर्वाधिक अपघात हे रेल्वे रूळ ओलांडताना झाले आहेत. चेंबूर, गोवंडी, मानखुर्द, वाशी, सानपाडा, जुईनगर, सीवूड, नेरूळ, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली या रेल्वे स्थानकांदरम्यान सर्वाधिक अपघाताच्या घटना घडल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in