
यंदा उन्हाचा पारा अनेकदा ४० अंशावर गेला. या वाढत्या उन्हामुळे उष्माघाताचा त्रास अनेक नागरीकांना झाला. काही नागरिकांना रुग्णालयात दाखल करावे लागले तर उष्माघाताच्या संशयित मृत्यूंची संख्या २९ झाली आहे.
राज्यात यंदा उन्हाचा तडाखा चांगलाच वाढलेला दिसला. उष्माघाताच्या रुग्णांसह त्यामुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये वाढ झाली आहे. आरोग्य राज्यात १ मार्च २०२२ पासून आतापर्यंत विविध जिल्ह्यांमध्ये उष्माघाताने २९ संशयित मृत्यूची नोंद झाली आहे. ही संख्या गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक आहे. गेल्या दोन महिन्यांत ५४३ उष्माघाताचे रुग्ण नोंदले गेले आहेत. त्यापैकी सर्वाधिक ४१९ रुग्णांची नागपुरात नोंद झाली. त्यापाठोपाठ चंद्रपूर १६८, अकोला ४४, पुणे २७, नाशिक १७, औरंगाबाद १५, सोलापूर २५, लातूर आणि कोल्हापूर प्रत्येकी एका उष्माघाताच्या रुग्णाची नोंद झाली. महाराष्ट्रातील एकूण २९ मृत्यूंपैकी सर्वाधिक १२ मृत्यू नागपुरात, त्यानंतर औरंगाबाद पाच, नाशिक चार, अकोला येथे तीन मृत्यू झाले असल्याची माहिती विभागाने दिलेल्या आकडेवारीतून समोर आली.
आरोग्य विभागाने यंदा अनेक वेळा तापमानातील होणार्या वाढीमुळे दुपारच्या वेळी शक्यतो बाहेर जाणे टाळावे असे सांगितले आहे. तसेच चक्कर, मळमळ, छातीत जळजळ, थकवा आदी लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. काही त्रास जाणवलाच तर तातडीने रुग्णालयात जावे उष्माघात न होण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी केले.