२६ सप्टेंबरपासून रिक्षा-टॅक्सी चालकांचा बेमुदत संप

मंत्री उदय सामंतांचे १० दिवसात भाडेवाढ देण्याचे आश्वासन ठरले फोल
२६ सप्टेंबरपासून रिक्षा-टॅक्सी चालकांचा बेमुदत संप

मागील ६ महिन्यांपासून शहरातील रिक्षा - टॅक्सीचालक युनियन्स भाडेवाढीबाबत शासन दरबारी फेऱ्या मारत आहेत. मुंबईतील रिक्षा-टॅक्सी युनियनकडून खटुआ समितीच्या शिफारशीनुसार म्हणजेच १० रुपये इतकी भाडेवाढ मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे. १३ सप्टेंबर रोजी शासनातर्फे मंत्री उदय सामंत आणि रिक्षा टॅक्सी युनियन यांच्यामध्ये बैठक संपन्न झाली. या बैठकीत पुढील १० दिवसात भाडेवाढ करण्यात येईल असे आश्वासन सामंत यांच्याकडून देण्यात आले. मात्र आजतागायत कोणतीही भाडेवाढ झाली नसून दिलेला शब्द सामंत यांनी न पाळल्याचा आरोप करत मुंबईतील रिक्षा-टॅक्सी चालकांनी २६ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

सीएनजीच्या दरात झालेली वाढ आणि त्यामुळे निर्माण होणारी आर्थिक समस्या यामुळे मुंबईत टॅक्सीच्या किमान भाड्यात १० रुपयांनी वाढ करण्याची मागणी टॅक्सी युनियनकडून करण्यात आली. सध्या मुंबईत टॅक्सीचे किमान भाडे २५ रुपये एवढे आहे. मात्र वाढत्या सीएनजी दरामुळे हे भाडे कमी असल्याने त्यात वाढ करावी अशी मागणी मागील सहा महिन्यांपासून करण्यात येत असे. याबाबत निवेदने, संप पुकारत टॅक्सी चालक संघटना वेळोवेळी आक्रमक झाल्या आहेत. १५ सप्टेंबरपासून रिक्षा टॅक्सी युनियनकडून बेमुदत संप पुकारण्यात आला होता. मात्र चर्चेचे आश्वासन दिल्याने हा संप संघटनांकडून तूर्तास मागे घेण्यात आला. परंतु १३ सप्टेंबर रोजी मंत्री उदय सामंत यांच्यासोबत झालेली बैठीकी देखील निष्फळ ठरल्याने टॅक्सी युनियनकडून २६ सप्टेंबरपासून बेमुदत संप जाहीर केला आहे. शहरातील रिक्षा चालकांनी देखील पाठिंबा दर्शवला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in