भारतीय शेअर बाजारात तेजी;सेन्सेक्सने ५८ ओलांडला हजारांचा टप्पा

३०-शेअर बीएसई सेन्सेक्स ५४५.२५ अंक किंवा ०.९५ टक्का उसळून ५८,११५.५० वर बंद झाला
 भारतीय शेअर बाजारात तेजी;सेन्सेक्सने ५८ ओलांडला हजारांचा टप्पा

सकारात्मक जागतिक बाजार आणि रिलायन्स इंडस्ट्रीज आणि वाहन कंपन्यांच्या समभागांची जोरदार खरेदी झाल्यानेसलग चौथ्या दिवशी भारतीय शेअर बाजारात तेजी राहिली. सेन्सेक्स ५४५ अंकांनी उसळल्याने यंदा १३ एप्रिलनंतर प्रथमच सेन्सेक्सने पुन्हा ५८ हजारांचा टप्पा ओलांडला.

दि ३०-शेअर बीएसई सेन्सेक्स ५४५.२५ अंक किंवा ०.९५ टक्का उसळून ५८,११५.५० वर बंद झाला. अशाच प्रकारे राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी १८१.८० अंक किंवा १.०६ टक्के वधारुन १७,३४०.०५ वर बंद झाला होता.

सेन्सेक्सवर्गवारीत महिंद्रा ॲण्ड महिंद्राने गेल्या महिन्यात प्रवासी वाहन विक्रीत ३३ टक्के वाढ झाल्याचे जाहीर केल्यानंतर कंपनीचा समभाग सर्वाधिक ६.१५ टक्के वाढला. तर रिलायन्स इंडस्ट्रीज आणि भारती एअरटेलचा समभाग २.६४ टक्के वाढला. मारुती सुझुकी, कोटक महिंद्रा बँक, एनटीपीसी, पॉवरग्रीड आणि अल्ट्राटेक सिमेंट यांच्या समभागात वाढ झाली. तर सन फार्मा, हिंदुस्तान युनिलिव्हर, इंडस‌्इंड बँक, नेस्ले इंडिया, एशियन पेंटस‌् आणि टीसीएस यांच्या समभागात २.६५ टक्के घसरण झाली. दरम्यान, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया २२ पैशांनी मजबूत होऊन ७९.०२ वर बंद झाला. तसेच विदेशी गुंतवणूक संस्थांनी शुक्रवारी १,०४६.३२ कोटींच्या समभागांची खरेदी केली.

logo
marathi.freepressjournal.in