विशेष मुलांसाठी प्रारंभिक उपचार आणि पुनर्वसन केंद्र ;नायर रुग्णालयाअंतर्गत नागपाडा येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण 

मुंबई सेंट्रल येथील नागपाडा परिसरात 'विशेष मुलांसाठी प्रारंभिक उपचार आणि पुनर्वसन केंद्र' साकारण्यात आले आहे
विशेष मुलांसाठी प्रारंभिक उपचार आणि पुनर्वसन केंद्र ;नायर रुग्णालयाअंतर्गत नागपाडा येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण 
PM

मुंबई : नायर रुग्णालयाअंतर्गत नागपाडा येथे विशेष मुलांसाठी प्रारंभिक उपचार आणि पुनर्वसन केंद्र सुरू केले. त्याच धर्तीवर पूर्व व पश्चिम उपनगरात ही विशेष मुलांसाठी पूर्ण क्षमतेने अशा स्वरुपाची केंद्र सुरू करा, अशी सूचना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. खासगी रूग्णालयापेक्षाही अधिक दर्जेदार आणि विशेष मुलांवर विनामूल्य उपचार होणार असल्याने पालिका प्रशासनाचे कौतुक केले. तसेच विशेष मुलांसाठी अशी केंद्र राज्यात अन्य ठिकाणी सुरू करणे गरजेचे आहे, असे ही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

दरम्यान, मुंबई सेंट्रल येथील नागपाडा परिसरात 'विशेष मुलांसाठी प्रारंभिक उपचार आणि पुनर्वसन केंद्र' साकारण्यात आले आहे. पाच मजली इमारतीत साकारलेल्या या केंद्राचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच कुमारी बुशरा रईस शेख यांच्या संयुक्त हस्ते रविवारी झाले. 

राज्याचे शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर; कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार यामिनी यशवंत जाधव, आमदार रईस शेख,  अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव, सहआयुक्त (पालिका आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे, उप आयुक्त (परिमंडळ २) रमाकांत बिरादार, उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) तथा नायर दंत रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्राडे, टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय व बाई य. ल. नायर धर्मादाय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

विनामूल्य उपचार 

विशेष मुलांसाठी एकाच छत्राखाली केंद्र असणे, ही काळाची गरज आहे. विशेष मुलांसाठीच्या अनेक वैद्यकीय उपचाराच्या गरजा या आर्थिकदृष्ट्या पालकांना न परवडणाऱ्या असतात; मात्र पालिकेने साकारलेल्या या केंद्रातून विशेष मुलांवर विनामूल्य उपचार करण्यात येतील, त्यामुळे पालकांना दिलासा मिळेल आणि संबंधित रुग्णांची सोय होईल, त्याचे समाधान मोठे आहे, असे शिंदे यांनी यावेळी नमूद केले. विशेष मुलांना स्वच्छतेची गरज सर्वाधिक असते. म्हणून नियमितपणे परिसरात आणि एकूणच शहरात स्वच्छता व्हायला हवी, असेही ते म्हणाले.

राज्यातील इतर शहरांमध्येही उभारण्याची गरज 

विशेष मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, त्यांच्यावर उपचार करणे ही आव्हानात्मक बाब आहे. त्यासाठी अतिशय जिद्द आणि अथक प्रयत्न करावे लागतात. अशा विशेष मुलांसाठी अवितरपणे कामकाज करणे ही अतिशय मोलाची बाब आहे.  महानगरपालिकेच्या या केंद्राचा आदर्श घेवून अशा स्वरूपातील केंद्रं मुंबईतील पूर्व व पश्चिम उपनगर, ठाणे यासह राज्यातील इतर शहरांमध्येही उभारण्याची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

logo
marathi.freepressjournal.in