मुंबईतील किल्ल्यांची डागडुजी करत सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी माहिम, वरळी किल्ल्यांचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. आता शिवडी किल्ल्याला गतवैभव मिळवून देण्यासाठी पालिका प्रशासनाने पुढाकार घेतला असून, पालिकेच्या मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने पुढाकार घेतला आहे. यासाठी १८ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. दरम्यान, पोर्ट ट्रस्टने परवानगी दिल्यास किल्ल्याच्या खाली कॅफेटेरिया बनवण्यात येणार आहे.
शिवडीचा किल्ला हार्बर मार्गावरील शिवडी स्थानकाच्या पूर्वेला १० ते १५ मिनिटांच्या अंतरावर आहे. परळ बेटाच्या पूर्व किनाऱ्यावरील टेकडीवर असलेला हा किल्ला १५३४च्या तहामुळे पोर्तुगिजांच्या ताब्यात आल्यानंतर किल्ल्याची डागडुजी करण्यात आली. १६७२मध्ये जंजिऱ्याच्या सिद्धीकडून मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतर इंग्रजांनी अनेक नवीन किल्ले बांधले व जुने किल्ले मजबूत केले. त्यात या किल्ल्याचा समावेश होता. इंग्रजांनी १६८०मध्ये, तर मुंबई पालिकेने २००७-०८ मध्ये किल्ल्याचे नूतनीकरण व मजबुतीकरण केले होते.
कोळीवाडा यांना जोडणारा हा किल्ला खडकाळ टेकडीवर आहे. बाहेरच्या बाजूस एक तटबंदी व आतमध्ये एक तटबंदी असलेला हा किल्ला साधारण १६व्या शतकात बांधण्यात आला आहे. पाच शतकांचे उन्हाळे-पावसाळे अंगावर घेतलेला हा किल्ला आजही डोलात उभा आहे.