मुंबई महापालिकेतील भ्रष्‍टाचाराची ‘कॅग’मार्फत चौकशी - देवेंद्र फडणवीस

मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्‍टाचाराची अनेक प्रकरणे असून त्‍याची चौकशी करण्याची मागणी सत्ताधारी आमदारांनी या चर्चेत सहभागी होताना केली
Twitter/@Dev_Fadnavis
Twitter/@Dev_Fadnavis

मुंबई महानगरपालिकेत काही कामांमध्ये प्रचंड भ्रष्‍टाचार झाला आहे. सर्वसामान्य जनतेचा पैसा वाईट पद्धतीने वळविण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकाराची विशेष ‘कॅग’ नेमून चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत केली. मुंबईतील सर्व १२०० किमीचे महापालिकेचे रस्‍ते पुढच्या तीन वर्षांत पूर्ण काँक्रीटचे करून महापालिकेतील खड्ड्यांचे ‘अर्थकारणही’ बंद करून टाकणार असल्‍याचे ते म्‍हणाले.

मुंबईतील गृहनिर्माण, मुंबई महानगरपालिका आदी विविध विषयांशी निगडित प्रश्नांसबंधी सत्‍ताधारी पक्षातर्फे नियम २९३ अन्वये प्रस्‍ताव देऊन चर्चा उपस्‍थित करण्यात आली होती. या चर्चेला उत्‍तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्‍टाचाराची अनेक प्रकरणे असून त्‍याची चौकशी करण्याची मागणी सत्ताधारी आमदारांनी या चर्चेत सहभागी होताना केली होती. त्‍याची दखल घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्‍हणाले, “महापालिकेतील अधिकाऱ्यांनी तर रातोरात कंपन्या स्‍थापन करून त्‍या माध्यमातून कंत्राटे मिळविली आहेत. कोविड सेंटरमध्येही घोटाळे आहेत. रस्‍ते बांधण्यासाठी स्‍थानिक कंत्राटदार हा पात्र ठरतो; मात्र एल अॅण्ड टी सारखी मोठी कंपनी पात्र ठरत नाही. भेंडीबाजारातील इमारतींच्या विकासासाठी आराखडा तयार करण्यात आला होता; मात्र तो कोणी तरी रद्द केला. यातदेखील भ्रष्‍टाचार झालाय. मुंबई महापालिकेतील काही कामांमध्ये तर मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले आहेत. मोठ्या प्रमाणात जनतेचा पैसा वाईट पद्धतीने वळविण्यात आला आहे. या गैरव्यवहारांची स्‍पेशल कॅग नेमून चौकशी करण्यात येणार आहे,” अशी घोषणा फडणवीस यांनी केली.

logo
marathi.freepressjournal.in