गेल्या चार वर्षांत एसटी बसच्या अपघातात १३२ प्रवाशांचा मृत्यू झाला असून गेल्या तीन वर्षांमध्ये महामंडळाला अपघातग्रस्त एसटीतील प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना नुकसान भरपाईपोटी १०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम द्यावी लागली आहे. दोन दिवसांपूर्वी एसटी बस मध्य प्रदेशमधील इंदूरमध्ये नर्मदा नदीत कोसळून चालक, वाहक तसेच अन्य १० जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे आता चालकाची चूक असो वा नसो एसटीचे होणारे अपघात तसेच वाहतूक नियमांना दिली जाणारी तिलांजली इत्यादी मुद्दे ऐरणीवर आले आहेत.
राज्यात विविध ठिकाणी एसटीच्या बसगाड्यांचे अपघात चालकाच्या किंवा अन्य वाहनचालकांच्या चुकीमुळे होतात. या अपघातांमध्ये एसटी प्रवाशांना जीव गमावावा लागतो किंवा गंभीर दुखापत होते. २०१८-१९ पासून २०२१-२२ पर्यंत एकूण १००३ जीवघेणे अपघात झाले. यामध्ये एकूण १३२ एसटी प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. २०१८-१९ आणि २०१९-२० मध्ये अनुक्रमे ३७७ आणि ३६० जीवघेणे अपघात झाले होते. त्यानंतर कोरोना आणि लागू झालेल्या कडक निर्बंधांमुळे अपघातांची संख्या कमी झाली. २०२०-२१ मध्ये १३६ आणि २०२१-२२ मध्ये १३० अपघातांची नोंद एसटी महामंडळाकडे झाली. २०२१-२२ मध्ये १३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.