

मुंबई : राष्ट्रीय परीक्षा एजन्सीमार्फत (एनटीए) घेण्यात आलेल्या संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई) मुख्य सत्र २ परीक्षेचा (बी.ई./बी.टेक पेपर १) निकाल आज जाहीर करण्यात आला. या परीक्षेत देशातील २६ विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाईल गुण मिळवले आहेत. यामध्ये राज्यातील दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. राज्यातील सिद्धार्थ आठल्ये आणि माधव विराडिया या दोन विद्यार्थ्यांनी जेईईमध्ये अव्वल स्थान पटकावले.
देशातील अभियांत्रिकी प्रवेशासाठी बंधनकारक असलेल्या जेईई मुख्य २०२६ सत्र २ परीक्षेची उत्तरतालिका आज दुपारी एनटीएकडून जाहीर करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी निकाल जाहीर करण्यात आला.
निकालामध्ये १०० पर्सेंटाईल मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आंध्र प्रदेशामधून पसाला मोहिथ, बिहारमधून शुभम कुमार, दिल्लीतून आदित्य गुप्ता, गुजरातमधून पुरोहित निमय, हरियाणामधून अनय जैन, महाराष्ट्रातून माधव विराडिया आणि सिद्धार्थ आठल्ये, ओडिशामधून भावेश पात्रा, राजस्थानमधून कबीर छिल्लर, तामिळनाडूतून थाम्मिना गिरीश, तेलंगणामधील मंथा कामेश या विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाईल मिळवत राज्यातून अव्वल आले आहेत.
शैक्षणिक सत्र २०२६-२७ साठी २ ते ८ एप्रिलदरम्यान सत्र २ ची परीक्षा घेण्यात आली. देशातील ३१९ शहरांमधील ५८४ केंद्रांवर ही परीक्षा झाली. यामध्ये देशाबाहेरील १५ शहरांचाही समावेश होता. जेईई मुख्य २०२६ सत्र २ परीक्षेसाठी तब्बल ११ लाख १० हजार ९०४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये ७ लाख ५६ हजार ९७६ विद्यार्थी तर ३ लाख ५३ हजार ९२८ मुलींचा समावेश होता. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी १० लाख ३४ हजार ३३० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.