

मुंबई : दहा वर्षांपूर्वी, सप्टेंबर २०१६ मध्ये रिलायन्स जिओने मुंबई आणि महाराष्ट्रातील दूरसंचार क्षेत्रात प्रवेश केला. शून्य ग्राहकसंख्येपासून सुरुवात करत जिओने पहिल्याच महिन्यात दोन्ही सर्कलमध्ये १५.५ लाख ग्राहक जोडले. जून २०२६ पर्यंत जिओचा ग्राहकवर्ग ५.७९ कोटींवर पोहोचला.
सप्टेंबर २०१६ मधील सुरुवातीच्या १५.५ लाख ग्राहकांपासून जून २०२६ मधील ५.७९ कोटी ग्राहकांपर्यंत जिओचा ग्राहकवर्ग ४५ टक्के चक्रवाढ वार्षिक वाढ दराने वाढला आहे. मुंबई-महाराष्ट्रातील एकत्रित वायरलेस ग्राहक बाजारपेठेत जिओचा वाटा ४० टक्के आहे.
जिओने सुरुवातीपासूनच ४जी आणि ऑल-आयपी नेटवर्कसह बाजारात प्रवेश केला. परवडणारा डेटा आणि मोफत आऊटगोइंग कॉल्समुळे तत्कालीन टॅरिफ रचनेला मोठे आव्हान निर्माण झाले आणि मोबाइल सेवांच्या अर्थकारणातच बदल झाला. जिओच्या ४जी व्होल्ट आधारित नेटवर्कमुळे आणि मोफत कॉलिंगमुळे ग्राहकांसाठी मोबाइल सेवांचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी झाला.
जिओच्या वाढीचा परिणाम उर्वरित बाजारपेठेच्या तुलनेत अधिक स्पष्टपणे दिसून येतो. जिओपूर्वी ऑगस्ट २०१६ मध्ये मुंबई आणि महाराष्ट्रात मिळून ११.५२ कोटी वायरलेस ग्राहक होते. हे सर्व ग्राहक तत्कालीन विद्यमान ऑपरेटर्सकडे होते. जून २०२६ पर्यंत एकूण बाजारपेठ वाढून १४.४७ कोटी ग्राहकांवर पोहोचली.
यापैकी एकट्या जिओकडे ५.७९ कोटी कनेक्शन्स आहेत. इतर सर्व ऑपरेटर्सचा एकत्रित ग्राहकवर्ग सध्या ८.६७ कोटी आहे.
चार वर्षांपेक्षा कमी कालावधीत क्रमांक एक
मुंबई-महाराष्ट्राच्या एकत्रित बाजारपेठेत क्रमांक २चे स्थान मिळवण्यासाठी जिओला दोन वर्षांपेक्षा कमी कालावधी लागला. सप्टेंबर २०१६ मध्ये लॉन्च झाल्यानंतर एप्रिल २०१८ मध्ये जिओने एअरटेलला मागे टाकले. त्यानंतर जुलै २०२० मध्ये जिओने व्होडाफोन आयडियाला मागे टाकत सर्वात मोठा ऑपरेटर होण्याचा मान मिळवला. अशा प्रकारे लॉन्चनंतर चार वर्षांपेक्षा कमी कालावधीत जिओने मुंबई-महाराष्ट्राच्या बाजारपेठेत क्रमांक एकचे स्थान मिळवले. त्यानंतर जिओने हे आघाडीचे स्थान कायम राखले आहे. जून २०२६ पर्यंत जिओचा देशभरातील ग्राहकवर्ग ५३.३३ कोटींवर पोहोचला असून, त्यापैकी २८.५ कोटी ग्राहक ५जी सेवांचा वापर करत आहेत. जिओच्या नेटवर्कवरील मासिक डेटा वापरही प्रति ग्राहक ४३.७ जीबीपर्यंत वाढला आहे.