कोरोनाची चौथी लाट ऐनभरात असून गेल्या आठवडाभरात मुंबईत दररोज जवळपास हजार रुग्ण आढळत आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन पालिकेने सर्वतोपरी व्यवस्था केली आहे. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी), मालाड आणि एनएससीआय (वरळी) या तीन जम्बो केंद्रांना अलर्टवर ठेवले आहे.
कोणत्याही प्रकारची कमतरता भासू नये म्हणून सर्व वैद्यकीय उपकरणांची तपासणी करण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत. पालिका आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल यांनी आधीच सर्व जम्बो कोविड केंद्रांना पुरेसे कर्मचारी ठेवण्याचे निर्देशही दिले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मालाड येथील जम्बो सेंटरला प्राधान्य दिले जात आहे. रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर दहिसर, कांजूरमार्ग आणि गोरेगाव येथील केंद्र बंद करण्यात आले. बीकेसी, मालाड, सेव्हन हिल्स ही केंद्रे अद्याप सुरू आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता मास्कसक्तीही पुन्हा करण्यात येण्याची शक्यता आहे.