कळवा-ऐरोली उन्नत प्रकल्प ७ वर्षांपासून रखडलेल्या अवस्थेत

कळवा-ऐरोली उन्नत प्रकल्प ७ वर्षांपासून रखडलेल्या अवस्थेत
Published on

उपनगरीय रेल्वे मार्गावरील अनेक प्रकल्प आजही प्रलंबित आहेत. यामध्ये एमयूटीपी ३ मधील कळवा-ऐरोली उन्नत प्रकल्प तब्ब्ल ७ वर्षांपासून रखडलेल्या अवस्थेत आहे. सद्यस्थितीत केवळ ३० टक्के काम या प्रकल्पाचे पूर्ण झाले असून उन्नत पूल उभारण्यासाठीच्या जागेत दीडशेहून अधिक अवैध झोपड्या आहेत. यामुळे या प्रलंबित प्रकल्पांचा लाखो प्रवाशांना फटका सहन करावा लागत आहे.

२०१५मध्ये कळवा-ऐरोली प्रकल्प मंजूर करण्यात आला होता. या प्रकल्पासाठी १.८८ हेक्टर सरकारी आणि ०.६७ हेक्टर खासगी अशी एकूण २.५५ हेक्टर जमिनीची आवश्यकता होती. यापैकी १.९५ हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण झाले आहे. उर्वरित ०.६० हेक्टर जमिनीचे संपादन बाकी आहे. हेच संपादन होण्यासाठी विलंब होत असून याचे मुख्य कारण म्हणजे मार्गावरील बहुतांशी जागेवर अनधिकृत झोपड्या वसलेल्या आहेत. ऑक्टोबर २०१८मध्ये रेल्वेने प्रकल्पबाधितांचे सर्वेक्षण करत १०८० प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन करण्याच्या सूचना रेल्वेने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) केल्या. या अहवालानंतर जानेवारी, २०२०मध्ये एमएमआरडीएने ९२४ प्रकल्पबाधितांसाठी पर्यायी घरे दिली आहेत. मात्र त्याठिकाणी रोजगार नसल्याचे सांगत प्रकल्पबाधितांनी तेथे जाण्यास नकार दिला आहे. पर्यायी घरे कळव्यातच हवी असल्याचे सांगत प्रकल्पबाधितांनी घर सोडण्यास नकार दिला आहे. तर एमएमआरडीएने वैधतेच्या मुद्द्यावरून १५६ झोपडपट्टींचे पुनर्वसन केलेले नाही.

logo
marathi.freepressjournal.in