अंधेरी येथे राहणाऱ्या एका महिला गायकाचा विनयभंग केल्याप्रकरणी कमाल खान याला शनिवारी वर्सोवा पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कमाल खानविरुद्ध वांद्रे पोलीस ठाण्यात अन्य एका गुन्ह्यांची नोंद असून याच गुन्ह्यांत लवकरच त्याचा वांद्रे पोलिसांकडून ताबा घेणार आहे. दोन वर्षांपूर्वी वादग्रस्त ट्विट केल्याप्रकरणी कमाल खानविरुद्ध गोरेगाव पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यांत त्याच्याविरुद्ध पोलिसांनी लुक आऊट नोटीस बजाविली होती. दोन वर्षांनी मुंबईत येताच त्याला मालाड पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयीन कोठडीत असलेल्या कमालचा शनिवारी वर्सोवा पोलिसांनी ताबा घेतला होता. त्याच्यावर एका महिला सिंगरचा विनयभंग केल्याचा आरोप आहे.
मालाड पोलिसांनी कमाल खानला अटक केल्याचे समजताच तिने वर्सोवा पोलिसांना घडलेला प्रकार सांगून त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा नोंद होताच त्याला शनिवारी पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.