सोलापूर, अक्कलकोटबद्दल कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले...
महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद हा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी 'जत तालुक्यातील ४० गावे कर्नाटकमध्ये सामील होण्यास इच्छुक असल्याचे बोलल्यानंतर महाराष्ट्रात मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याला चिथावणीखोर म्हंटले आहे. त्यांनी म्हंटले आहे की, "महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटक-महाराष्ट्र सीमा प्रश्नाबाबत चिथावणीखोर वक्तव्य केल्याने त्यांचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. देशाची जमीन, पाणी आणि सीमांचे रक्षण करण्यासाठी कर्नाटक सरकार कटिबद्ध आहे."
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, "कर्नाटकच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये जागा सोडण्याचा प्रश्नच येत नाही. महाराष्ट्रातील सोलापूर, अक्कलकोट या कन्नड भाषिक भागांचा कर्नाटकामध्ये समावेश व्हावा, अशी आमची मागणी आहे. २००४ पासून महाराष्ट्र सरकारने दोन्ही राज्यांमधील सीमाप्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल केला आहे. आतापर्यंत त्यामध्ये यश आलेले नाही. पुढेही येईल असे वाटत नाही. आमचा कायदेशीर लढा मजबूत करण्यासाठी आम्ही तयार आहोत,"