

मुंबई : खार दांडा परिसरातील वारिन पाडा येथील दीपगृहाजवळ समुद्रात मासेमारी करत असताना बोट उलटल्याने दोन जण समुद्रात बुडाल्याची घटना बुधवारी (दि. २७) सायंकाळी घडली. या दुर्घटनेत अशोक किशन राठोड (वय ५५) यांचा मृत्यू झाला असून केतन राठोड (वय ३२) हे जखमी झाले.
बुधवारी सायंकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास खार दांडा परिसरातील वारिन पाडा येथील दीपगृहाजवळ मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात उलटली. या दुर्घटनेत दोघेही पाण्यात पडले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
दोघांना समुद्रातून बाहेर काढत उपचारासाठी वांद्रे येथील भाभा महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले. अशोक किशन राठोड (वय ५५) यांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी मृत घोषित करण्यात आले, तर केतन राठोड (३२) यांची प्रकृती स्थिर असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, या घटनेचा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.