मुंबई : गणेशोत्सव म्हणजे कोकणवासीयांचा जीव की प्राण. गणपतीला कोणत्याही परिस्थिती गावाला जायचेच असा कोकणवासीयांचा आग्रह असतो. यंदा १४ सप्टेंबरला गणेशोत्सव असून त्यासाठी कोकण रेल्वेची तिकिटे काढायला गेलेल्या भाविकांच्या नशिबी अवघ्या दोन मिनिटांत ‘रिग्रेट’ आले.
रविवारी १० सप्टेंबरची रेल्वे तिकीट विक्री खुली झाली. सकाळी अवघ्या दोन मिनिटांत कोकणकन्या, तुतारी, जनशताब्दी, मत्स्यगंधा, मांडवी, दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस आदी कोकणात जाणाऱ्या लोकप्रिय गाड्या फुल्ल झाल्या. या गाड्यांची प्रतीक्षायादी संपून त्या ‘रिग्रेट’ दाखवायला लागल्या आहेत. अवघ्या दोन मिनिटात गाडया फुल्ल होत असल्याने कोकणात जाणारे भाविक चिंतेत पडले आहेत. त्यामुळे अतिरिक्त गाड्या सोडण्याची मागणी रेल्वेकडे सुरू झाली आहे.
मुंबई, ठाणे, वसई-विरार, नवी मुंबई परिसरात वास्तव्यास असलेले कोकणवासीय गणेशोत्सवानिमित्त आपल्या गावी दरवर्षी जातात. कोकणातील सर्वात मोठा सण म्हणून ओळखला जाणारा गणेशोत्सव यावर्षी १४ सप्टेंबर रोजीपासून सुरू होत आहे. यानिमित्त गावी रेल्वेने जाण्यासाठी तिकीट काढण्यास सुरुवात झाली आहे.
रेल्वे सुटण्याच्या ६० दिवसापासून रेल्वेचे आरक्षण सुरू होते. त्यानुसार १० जुलै रोजीपासून ८ सप्टेंबर रोजीचे तिकीट काढण्यास सुरुवात झाली आहे. तर, ११ जुलै रोजी ९ सप्टेंबर रोजीची तिकीट विक्री सुरू झाली.
कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे आरक्षण सुरू होताच गेल्या दोन दिवसांपासून कोकणवासीय आरक्षण केंद्रावर, आयआरसीटीसी आणि खासगी संकेतस्थळावरून व अन्य पर्यायी मार्गावरून तिकिटे काढत आहेत. कोकणकन्यासह इतर गाड्यांची तिकिटे एकाचवेळी काढण्यात आल्याने काही मिनिटांत आरक्षण फुल झाले. त्यामुळे कोकणातील एक्स्प्रेसचे तिकीट सध्या 'रिग्रेट' दाखवत असल्याने कोकणवासीयांची चिंता वाढली आहे.