

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लोटे परशुराम एमआयडीसीमध्ये असलेल्या लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनीत पीफास हे जीवघेणे रसायन बनवले जाते. ज्यामुळे मानवी आरोग्य आणि पर्यावरण धोक्यात आले आहे. ही कंपनी बंद करावी. त्याचप्रमाणे रत्नागिरीतील बारसू आणि पूर्णगड तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्प रद्द करावेत आणि कोकण प्रदूषित होण्यासाठी वाचवावे, यासाठी मुंबईतील शेकडो कोकणवासीयांनी शनिवारी भव्य एकजूट दाखवत या विनाशकारी प्रकल्पांना सरसकट नामंजूर केले.
दादर येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातील सुरेंद्र गावस्कर सभागृहात जनता दल सेक्युलर, कोकण जनविकास समिती आणि मूलभूत अधिकार संघर्ष समिती यांच्या वतीने बोलावण्यात आलेल्या मेळाव्यात ‘कोकणची कैफियत’ हा परिसंवाद झाला. यावेळी अणुऊर्जा अभ्यासक डॉ. मंगेश सावंत, प्रा. अशोक रानडे, सामाजिक कार्यकर्ते अशोक जाधव, प्रकाश लव्हेकर, जनता दल राज्य कार्याध्यक्ष प्रभाकर नारकर यांनी मार्गदर्शन केले.
मंजूर केलेले ठराव
लक्ष्मी ऑर्गेनिकवर तत्काळ बंदी घालावी.
लोटे परशुराम परिसर आणि कंपनीतील घातक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येत असलेल्या तळोजा परिसरातील नागरिक आणि कामगारांची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी.
परिसरातील भूगर्भजलाची चाचणी करावी.
तीनही अणुऊर्जा प्रकल्प रद्द करावेत.
गेली १७ वर्षे रखडलेला मुंबई गोवा हायवे लवकर पूर्ण करण्यात यावा. या महामार्गावर टोल वसूल करण्यात येऊ नये.
काजू बाजार, निर्यात केंद्र इत्यादी सुविधा रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात उभारण्यात याव्यात, परप्रांतीयांना कोकणात शेत जमीन विकत घेण्यास प्रतिबंध करण्याचा कायदा करावा.