
मुंबई : कुर्ला पश्चिम येथे सोमवारी झालेल्या बेस्ट बस अपघातानंतर कुर्ला स्थानक पश्चिम ते कुर्ला आगार दरम्यान बेस्ट बससेवा तब्बल चार दिवसांनी सुरू करण्यात आली आहे. अपघातानंतर या ठिकाणी चार दिवस बससेवा बंद होती. यामुळे प्रवाशांना आणि वयोवृद्धांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. तर दुसरीकडे रिक्षाचालक प्रवाशांकडून दुप्पट भाडे घेत होते. परिणामी प्रवाशांच्या खिशाला कात्री लागत होती. दरम्यान, बेस्ट सेवा बंदप्रकरणी बेस्ट प्रशासन आणि वाहतूक पोलीस एकमेकांकडे बोट दाखवत होते. प्रवाशांचा रोष लक्षात घेत बेस्टने बससेवा पुन्हा सुरू केली आहे.
कुर्ला पश्चिम एस. जी. बर्वे मार्ग या ठिकाणी सोमवारी रात्री झालेल्या बेस्ट बसच्या भीषण अपघातानंतर बेस्टने कुर्ला स्थानक ते कुर्ला आगार दरम्यान बेस्ट सेवा बंद केली होती. वांद्रे, सांताक्रुझ, अंधेरी, साकीनाका इत्यादी मार्गावर धावणाऱ्या बेस्ट बसेस या गेल्या ४ दिवसांपासून कुर्ला आगार आणि सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड येथून धावत होत्या. कुर्ला स्थानकातून बेस्ट बस केव्हा सोडल्या जातील, याबाबत कुठलीही सूचना बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आलेली नव्हती. कुर्ला स्थानक ते कुर्ला आगार हे अंतर दीड किलोमीटर एवढे असल्याने प्रवाशांना कुर्ला आगारापर्यंत पायपीट करावी लागत होती.
कामगार वर्गात होती नाराजी
कुर्ला पश्चिम येथून नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणात प्रवास करीत असल्यामुळे त्यांना मागील चार दिवसांपासून कामावर जाण्यास वेळ होत होता. यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले होते. प्रवाशांचा रोष लक्षात घेत बेस्टकडून अपघाताच्या घटनेनंतर चार दिवसांनी बससेवा सुरू करण्यात आली आहे.