मुंबई : देशातील जनतेने एका विश्वासाने देशाचा कारभार चालविण्याची जबाबदारी भाजपवर सोपवली. पण, त्याच जनतेच्या मनात आज भाजपविरोधात नाराजीची भावना आहे. दहा वर्षे सत्ता हातात असलेल्यांना जमिनीवर पाय ठेवून काम करण्याची गरज होती. पण, त्यापासून त्यांचे नेतृत्व खूप दूर गेले. आमच्या एकत्र येण्यावरही ‘घमंडिया’ असे शब्द वापरून भाजपचे नेते टीका करत आहेत. आता आम्ही थांबणार नाही. चुकीच्या रस्त्यावर जाणार नाही. जे चुकीच्या रस्त्यावर गेले आहेत, त्यांना योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न करू, ते सोबत नाहीच आले तर त्यांना दूर करू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला.
आज इंडिया आघाडीच्या माध्यमातून २८ पक्ष एकत्र आले आहेत. देशातील वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळी स्थिती आहे. कुठे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, कुठे कामगार, युवकांच्या समस्या आहेत. आज जनतेने एका विश्वासाने देशाचा कारभार चालविण्याची जबाबदारी भाजपला दिली. आज त्याच जनतेच्या मनात नाराजीची भावना आहे. लोकशाहीच्या मार्गाने आज आम्ही एकत्र आलो. पण आमच्या बैठकीवरही भाजपच्या लोकांनी टीका केली. भाजप नेते म्हणाले, याची काय आवश्यकता आहे. यातून एकच गोष्ट स्पष्ट होते. दहा वर्षे सत्ता हातात आल्यानंतर जमिनीवर पाय ठेवून काम करण्याची आवश्यकता असते, त्यापासून नेतृत्व करणारे लोक खूप दूर गेले आहेत. विरोधी पक्षाचे लोक येतात तेव्हा भाजपचे वरिष्ठ नेते याबाबत घमंडिया असा उल्लेख करतात. त्यामुळे स्पष्ट होते की घमंडिया कोण आहे. आमची अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. त्यातूनच इंडियाच्या माध्यमातून एक नवा पर्याय देशात तयार करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे त्याचीच परिणती हे संमेलन आहे. आता आम्ही थांबणार नाही, चुकीच्या रस्त्यावर जाणार नाही. चुकीच्या रस्त्यावर गेलेल्यांना योग्य रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न करू, आले नाहीत तर त्यांना दूर करू. स्वच्छ आणि साफ प्रशासन देशवासीयांना देण्यासाठी जे करता येईल ते करू, असे शरद पवार म्हणाले.