मुंबई उत्तर पश्चिमच्या निकालाचा वाद आता उच्च न्यायालयात; रवींद्र वायकर, निवडणूक आयोग यांच्याविरोधात याचिका

मुंबई उत्तर- पश्चिम लोकसभा मतदारसंघातील रवींद्र वायकर यांच्या संशयास्पद पद्धतीने निवडणूक जिंकण्याचे प्रकरण आता उच्च न्यायालयात पोहोचले आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : मुंबई उत्तर- पश्चिम लोकसभा मतदारसंघातील रवींद्र वायकर यांच्या संशयास्पद पद्धतीने निवडणूक जिंकण्याचे प्रकरण आता उच्च न्यायालयात पोहोचले आहे. मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढविणारे उमेदवार भरत खिमजी शाह यांच्या वतीने ॲड. असीम सरोदे यांनी याचिका दाखल केली आहे. मतमोजणी आणि जाहीर झालेल्या निकालाला स्थगिती द्यावी, अशी मागणी याचिकेत केली आहे.

निवडणूक आयोगाला मोकळ्या आणि पारदर्शक वातावरणात निवडणुकीचे व मतमोजणीचे काम करण्यात अपयश आले, असा दावा करताना विजयाचे दिशेने अग्रक्रमावर असलेले अमोल कीर्तीकर यांना विजयी घोषित करण्यात आल्यानंतर पोस्टल बॅलेटची पुनर्मोजणी करण्याची मागणी रवींद्र वायकर यांच्यातर्फे करण्यात आली आणि विविध घडामोडींचा शेवट अचानक रवींद्र वायकर ४८ मतांने विजयी घोषित करण्यात आले.

यावेळी निवडणूक अधिकारी कार्यालयात तात्पुरत्या सेवेत असलेल्या दिनेश गुरव या व्यक्तीचा मोबाईल फोन प्राजक्ता वायकर-महाले आणि नंतर मंगेश पांडिलकर यांनी मतमोजणीच्या वेळी व मतमोजणी सुरू असलेल्या ठिकाणी वापरण्यावर मुख्यतः आक्षेप घेतला. निवडणूक अधिकारी कार्यालयात दिनेश गुरव या व्यक्तीची तात्पुरती झालेली नेमणूक योग्य आहे का? अशा प्रकारे खासगी कंपनीतील एखाद्या व्यक्तीची तात्पुरती नेमणूक होऊ शकते का?, निवडणूक आयोगासोबत कार्यरत कोणतीही व्यक्ती मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल फोन घेऊन जाऊ शकतात का? असे प्रश्न उपस्थित करून निवडणूक रिटरनिंग अधिकारी वंदना सूर्यवंशी यांच्यापासून केवळ २ फुटांच्या अंतरावर प्राजक्ता वायकर- महाले मोबाईल वापरताना त्यांनी आक्षेप का घेतला नाही? असे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in