मुंबई : डम्पिंग ग्राऊंडवर रोज हजारो मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येते. या कचऱ्यामुळे द्रवरुप विषारी वायू तयार होतो आणि नदीला जाऊन मिळते. यामुळे प्रदूषणाला धोका निर्माण होऊ नये परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये यासाठी लखनऊमध्ये शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाते, त्याच धर्तीवर डम्पिंग ग्राऊंडवर अद्यावत तंत्रज्ञान वापरण्यात येईल. यासाठी तज्ञांचे मत जाणून घेतले जाईल, अशी माहिती मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. दरम्यान, पुढील दोन महिन्यांत मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुंबई शहर प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहे. मुंबईतील हवेच्या गुणवत्तेचा दर्जा सुधारण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. वाहनांचे प्रदुषण, इमारतींच्या बांधकामांमुळे होणारे प्रदुषण यावर कसे नियंत्रण करता येईल याचा अभ्यास करण्यात येत आहे. केमिकल कंपन्याचे प्रदुषण, जैविक कचरा जाळला जातो, त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदुषण होत आहे. स्मशानभूमीतील धुरामुळे प्रदुषण होत असून यावर उपायोजना कराव्या लागतील. समुद्राच्या चौपाट्याच्या स्वच्छतेच्या दृष्टीने वेगळेगळे कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती केसरकर यांनी दिली.
सहा हजार ठिकाणी बांधकामे सुरू
मुंबईत सध्या सहा हजार ठिकाणी बांधकामे सुरू आहेत. या बांधकामावेळी नियमांचे पालन होत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूलिकण हवेत पसरतात आणि हवा प्रदूषित होते त्याचबरोबर मुंबईतील विविध वायू प्रकल्प, रिफायनरी यातूनही वायू प्रदूषण होत आहे. हे प्रदूषण कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून काही सूचना देण्यात आल्या आहेत. काही कंपन्या आणि उद्योग प्रदुषण रोखण्यासाठी पुढाकार घेण्यासाठी तयार असल्याची माहिती त्यांनी दिली.
समुद्रकिनाऱ्यांच्या सफाईवर लक्ष
मुंबईत गिरगाव, दादर, माहीम , जुहू, वर्सोवा, अक्सा बीच अशा चौपाटी आहेत. या चौपाट्यांवर रोज हजारो पर्यटक येत असतात. त्यामुळे चौपाट्याच्या स्वच्छतेवर भर दिला जात आहे. दादर चौपाटीवर मशिनद्वारे सफाई करण्यात येत असून, अन्य चौपाट्यांवर साफसफाई मशीनचा वापर करण्यात येईल, असे ही ते म्हणाले.