शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विरोधकांचा सभात्याग, मदत करा नाहीतर खुर्ची खाली करा; विधानसभेत गदारोळ

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विरोधकांचा सभात्याग, मदत करा नाहीतर खुर्ची खाली करा; विधानसभेत गदारोळ

आज अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून मोठा गदारोळ झाला, विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत सभात्याग केला.
Published on

आजही विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आक्रमक झाले. कांदाप्रश्न, अवकाळी पाऊस, नाफेडकडून पिकांची खरेदी यावरुन विरोधकांनी आवाज उठवला. विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस नेते नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईवरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, "नियम ५७ लागू करून शेतकरी प्रश्नावर कामकाज करा" अशी मागणी केली. पण, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांची मागणी फेटाळली. यानंतर सभागृहात विरोधकांनी गदारोळ सुरु केला.

विरोधकांनी सुरु केलेल्या गदारोळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण करण्याची गरज नाही, असे खडसावले. तसेच, ते म्हणाले की, "शेतकऱ्यांना मदत करण्याची सरकारचीही भूमिका आहे. नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. त्यानंतर तत्काळ मदत करण्यात येणार आहे. कांदा उत्पादकांच्या मागे सरकार खंबीरपणे उभे आहे." असे यावेळी त्यांनी सभागृहात सांगितले.

यानंतरही मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊनही कांदा खरेदी झालेली नाही, असे अजित पवार यांनी सभागृहात सांगितले. अजित पवारांच्या या मुद्द्याला उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले. पण विरोधकांनी सभागृहात गोंधळ घालायला सुरुवात केली आणि विरोधक ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसल्याने मुख्यमंत्री चांगलेच भडकले.

logo
marathi.freepressjournal.in