
आज राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस कांदा प्रश्नावरून चांगलाच गाजला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी कांद्याच्या पडलेल्या भावावरून सरकारवर निशाणा साधला. यावेळी राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी उपाययोजना करत नाहीत, असा गंभीर आरोप केला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना उत्तर दिले की, "हे शेतकऱ्यांचे सरकार असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करु," मात्र, यानंतर विरोधकांनी चांगलाच गोंधळ सुरु केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विरोधी पक्षाचे आमदार बोलूही देत नव्हते. तेव्हा अध्यक्षांनी शांत राहण्याचे आव्हान केले. एवढेच नव्हे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील त्यांना बोलू देण्याची विनंती केली. तरीही शांत न बसल्याने उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "तुम्हाला जर सरकारच्या कांदा धोरणासंदर्भात माहिती असेल, तर तुम्हीच बोला आम्ही बसतो." असे म्हणत संताप व्यक्त केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "कांदा निर्यातीवर कसलीही बंदी नसून हे सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांसोबत आहे. शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल तर सरकार त्यासंदर्भात मदतीचा निर्णय घेईल." असे आश्वासन दिले.