मुंबई महानगराची अर्थव्यवस्था ३०० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे लक्ष्य
मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारने सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात मोठी उद्दिष्टे निश्चित केली असून त्यानुसार पुढील चार वर्षांत म्हणजे सन २०३० पर्यंत येथील अर्थव्यवस्था १४० अब्ज डॉलरवरून ३०० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. यासाठी उद्योग, पायाभूत सुविधा, गृहनिर्माण आणि वाहतूक क्षेत्रात विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्थसंकल्पात दिली आहे.
वडाळा येथे जागतिक दर्जाचे स्टार्ट-अप आणि ‘इनोव्हेशन हब’ उभारण्यासाठी सुमारे १३० एकर जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या हबमुळे नवउद्योगांना चालना मिळून रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होणार असल्याचेही फडणवीस यांनी नमूद केले आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावरील ठाणे ते तलासरी दरम्यानची तीन स्थानके फेब्रुवारी २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पामुळे विरार, बोईसर आणि ठाणे परिसरात मोठ्या प्रमाणावर आर्थिक विकासाला चालना मिळणार असून स्थानक परिसरांच्या विकासासाठी व्यापक आराखडा तयार केला जाणार आहे.
शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू परिसरात तिसरी मुंबई (मुंबई ३.०) विकसित करण्याची योजना असून कर्नाळा-साई-चिरनेर, रायगड-पेण आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अधिसूचित क्षेत्राला ‘ग्रीन-फिल्ड विकास केंद्र’ म्हणून विकसित करण्यात येणार आहे. तसेच पालघर जिल्ह्यातील वाढवण येथे चौथी मुंबई विकसित करण्याचे नियोजन असून येथे लॉजिस्टिक्स आणि वेअरहाऊसिंगसाठी मोठे विकास केंद्र उभारले जाणार आहे.

