

जव्हार: जुन्या व देखभालीअभावी धोकादायक बनलेल्या बसेसमुळे प्रवाशांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण होत असल्याची आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जव्हार - वसई मार्गावरील एसटी बस साखरे गावाजवळ गुरुवारी दुपारी सुमारे ३.१५ वाजण्याच्या सुमारास धावत असताना जोरदार वाऱ्यामुळे बसचे छत अर्धवट उडाल्याची गंभीर घटना घडली.
या घटनेमुळे बसमधील प्रवाशांमध्ये एकच घबराट उडाली होती. सुदैवाने, कोणतीही जीवितहानी झाली नाही. बसची अवस्था आधीपासूनच जीर्ण व निकृष्ट असल्याचे प्रवाशांनी सांगितले. स्थानिक नागरिकांनी व प्रवाशांनी संताप व्यक्त करत परिवहन विभागाच्या दुर्लक्षावर तीव्र टीका केली आहे. भंगार अवस्थेतील बसेस रस्त्यावर धावत असल्याने अशा घटना वारंवार घडत असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, या घटनेनंतर संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी जुनी व धोकादायक वाहने त्वरित सेवेतून हटवावीत, अशी मागणी जोर धरत आहे.
ही बस जव्हार आगाराची नव्हती, बसचे छत उडाल्याचे प्रवाशांकडून समजले.सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
बाळासाहेब झरीकर, आगार व्यवस्थापक,जव्हार