महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमावाद आता हिंसक वळवणार पोहचण्याचे चिन्ह सध्या दिसत आहेत. कारण, कर्नाटक मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची वादग्रस्त वक्तव्य आणि आज बेळगावमध्ये झालेले हिंसक आंदोलन यामुळे आता महाराष्ट्रामध्येही यांचे पडसाद दिसू लागले आहेत. बेळगावमध्ये झालेल्या तोडफोडीनंतर पुण्यात कर्नाटकच्या बसला काळे फासण्यात आले. पुण्यातील स्वारगेट बस डेपोत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून हे आंदोलन करण्यात आले. स्वारगेट बस डेपोत उभ्या असलेल्या कर्नाटकच्या गाड्यांवर ‘जय महाराष्ट्र’ असे लिहून रंगरंगोटीही करण्यात आली. यावेळी, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी भगवे झेंडे फडकावत ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणा दिल्या.
बेळगावमधील हिरबागेवाडी टोलनाक्यावर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्राच्या ५हुन अधिक वाहनांचे नुकसान झाले. कन्नड रक्षण वेदिके संघटनेचे नारायण गौडा हे बेळगाव दौऱ्यावर गेले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांसोबत हिरबागेवाडी टोलनाक्याजवळ रास्ता रोको आंदोलन केले. कर्नाटक पोलिसांनी नारायण गौडांसह अनेक कार्यकर्त्यांना अटक केली. काहींनी गाड्यावर चढून घोषणाबाजी केली. तसेच, काहीजण गाड्यांसमोर आडवे झाले होते. महाराष्ट्रातील गाड्या पुढे जाऊ देणार नाही, अशी भूमिका या कार्यकर्त्यांनी घेतली. कन्नड रक्षण वेदिका महाराष्ट्रविरोधात केलेल्या या आंदोलनामुळे आता महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद आणखी पेटले आहे.