माहीम किल्ला अतिक्रमण मुक्त; मुंबईतील पुरातन वारसा जपणे शक्य

माहीम किल्ला ८०० वर्षें जुना असून, सीमा शुल्क विभागाने येथील सुरक्षा काढली आणि माहीम किल्ल्याला अतिक्रमणाचा विळखा बसला.
माहीम किल्ला अतिक्रमण मुक्त; मुंबईतील पुरातन वारसा जपणे शक्य

माहीम किल्ला सन ११४० आणि १२४१ दरम्यान बांधण्यात आला. माहीम किल्ला ८०० वर्षें जुना असून, सीमा शुल्क विभागाने येथील सुरक्षा काढली आणि माहीम किल्ल्याला अतिक्रमणाचा विळखा बसला. माहीम किल्ला हेरिटेज वास्तू असल्याने किल्ल्याचे जतन करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या जी उत्तर विभागाने येथील अतिक्रमणावर हातोडा चालवला आणि तब्बल ५० वर्षांनंतर माहीम किल्ला अतिक्रमण मुक्त झाल्याने माहीम किल्ल्याचा जीर्णोध्दार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, किल्ल्यावर अतिक्रमण केलेल्या पैकी २६३ पात्र झोपडीधारकांचे मालाड व कुर्ला येथे पुनर्वसन करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी दिली.

मुंबई महापालिकेच्या हद्दीत ऐतिहासिक माहीमचा किल्ला आहे. माहीम किल्ला मुंबईच्या समुद्र किनाऱ्यालगत वसलेला आहे. इंग्रजांनी माहीमचा किल्ला एके काळी बंदर म्हणून वापरला असून, तेथे सीमाशुल्क गृह उभारले होते. स्वातंत्र्यानंतर माहीम किल्ल्याचा परिसर सीमाशुल्क कार्यालयांनी रिकामा केला, मात्र सदर किल्ल्याची मालकी आजही सीमा शुल्क विभागाची आहे. १९७२ मध्ये, प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे आणि अवशेष अधिनियम, १९६० अन्वये जेव्हा माहीमचा किल्ला महाराष्ट्र अंतर्गत राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आला तेव्हा, सीमाशुल्क विभागाने गडावरील विद्यमान सुरक्षा काढली. त्यानंतर माहीम किल्ल्यावर संपूर्णपणे अतिक्रमण झाले आणि माहीम किल्ल्याचा इतिहास जमा होतो की काय, अशी शंका उपस्थित केली जाऊ लागली. किल्ल्यावर अतिक्रमण झाल्याने किल्ल्याच्या समुद्र बाजुच्या भागाची दुरवस्था झाली. या किल्ल्यावर २६७ झोपड्या आणि सुमारे तीन हजार रहिवासी राहत होते. त्यामुळे मानवतेच्या आधारावर आणि कोणताही अनुचित घटना टाळण्यासाठी माहीम किल्ला रिकामा करणे आणि पात्र झोपडीधारकांना विशेष प्रकल्प मानून त्यांना पर्यायी निवास व्यवस्था उपलब्ध करून देणे आवश्यक होते.

तसेच, महाराष्ट्र व मुंबईतील ऐतिहासिक वारसा असलेली वस्तू जपणे अत्यंत गरजेचे होते. त्यामुळे झोपडीधारकांना नोटीसी देण्यात आल्या व त्यांच्या झोपड्यांचे पुरावे, कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यांनी सादर केलेल्या पुरावे, कागदपत्रांच्या आधारे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रचलित धोरणांनुसार सदर झोपडीधारकांची पात्रता निश्चित करून त्यांना परिशिष्ट ०२ तयार करण्यात आले. एकूण २६७ पैकी २६३ झोपडीधारक पात्र ठरविण्यात आले आहे. पात्र झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन योग्य ठिकाणी करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण व मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्याशी पत्रव्यवहार साधला आणि त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मालाड येथील साईराज गुराईपाडा येथील सुरू असलेल्या संक्रमण शिबीर इमारतीत १७५ सदनिका या विभागास हस्तातरीत केल्या व मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने भंडारी मेटलर्जी येथील पुनर्वसन प्रकल्पाकरिता बांधण्यात आलेल्या इमारती मध्ये ७७ सदनिका या विभागास हस्तांतरित केल्या. तसेच, मालवणी येथील रॉयल फिंच इमारतीमधील ११ सदनिका प्राप्त झाल्या असून, त्यांना सदनिकांच्या चाव्या देण्यात आल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, या कामामध्ये जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांचे नेतृत्व, तसेच, उप- आयुक्त (परि-०२ ) रमाकांत बिरादार, अतिरिक्त आयुक्त (शहर) आशिष शर्मा, महानगरपालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंग चहल यांचे योग्य मार्गदर्शनात माहीम - किल्ल्यावरील अतिक्रमण काढणे शक्य झाले व माहीम किल्ला जीर्णोद्धार करणे व सदर किल्ल्याचे पुरातन वारसा जपणे शक्य झाले.

माहीम किल्ल्याचा इतिहास!

अपरंता (उत्तर कोकण) येथील राजा बिंबदेव याने येथे आपले राज्य बसावले. ह्या राज्याला 'महिकावती' असे देखील म्हणतात. बिंबदेव राजाणे बसावलेले राज्य भरभराटीला आले आणि त्याच्या वंशजांनी माहीम मध्ये माहीम किल्ला दरम्यान ११४० आणि १२४१ बांधला. आजच्या घडीला सदर किल्ला ८०० वर्षांहून जुना आहे.

टोटल स्टेशन सर्वेक्षण

माहीम किल्ला अतिक्रमण मुक्त झाल्यानंतर किल्ल्याचा जीर्णोध्दार करण्यासाठी विशेष प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले. किल्ल्यावरील पात्र झोपडी धारकांचे पुनर्वसन योग्य ठिकाणी पुनर्वसन व्हावे म्हणून त्यांची वेळो वेळी बैठका घेण्यात आल्या. तसेच येथील झोपड्यांचे टोटल स्टेशन सर्व्हेयर मार्फत सर्व्हे करण्यात आहे. त्यानंतर २६७ पैकी २६३ पत्र झोपडपट्टी धारकांना सोडतीद्वारे निश्चित करण्यात आलेल्या सदनिकांचे टप्या-टप्याने वाटप करण्यात आले.

काही झोपडीधारकांविरोधात गुन्हा दाखल!

काही झोपडीधारक त्यांना प्राप्त झालेले सदनिका घेत नसून, तिथेच वास्तव्य करीत असल्याने, संपूर्ण प्रकल्प बाधित होत असल्याने, या विभागातील अधिकाऱ्यांनी पोलीस बाळाच्या आधारे सदर सदनिका रिकाम्या करून निष्कासन कार्यवाही करण्यात आली. तसेच कार्यवाही दरम्यान काही झोपडीधाकांविरुद्ध जवळील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

सल्लागाराची नियुक्ती

पुढे, माहीम किल्ल्याची दुरुस्ती करून सदर किल्ला पर्यटन स्थळ म्हणून खुला करण्यासाठी पुरातन सल्लागार विकास दिलावर यांची नेमणूक करण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे.

logo
marathi.freepressjournal.in