

मुंबई : कबुतरांना खाद्य घालणे हे तेथील स्थानिकांच्या जीवाला धोकादायक आजारांचा संसर्ग पसरवू शकतो, असे नमूद करत सत्र न्यायालयाने कबुतरांना खाद्य घालणाऱ्या व्यावसायिकाला दोषी ठरवले. त्याच्या या कृत्याबद्दल त्याला ५ हजारांचा दंड ठोठावला.
मुंबई महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी त्रासदायक ठरत असल्याचे आणि नागरिकांच्या आरोग्याला धोका असल्याचे कारण देत शहरातील बहुतांश भागांत कबुतरांना खाद्य देण्यास बंदी घातल्यानंतर काही महिन्यांनी हा आदेश देण्यात आला. दादर येथील रहिवासी नितीन शेठ (५२) यांना १ ऑगस्टला माहीम परिसरात महापालिकेने बंद केलेल्या ‘कबुतरखाना’ (कबुतरांना खाद्य देण्याचे ठिकाण) येथे कबुतरांना धान्य टाकताना पकडण्यात आले होते. अतिरिक्त मुख्य न्यायिक दंडाधिकारी व्ही. यू. मिसाळ (वांद्रे) यांनी शेठ यांना दोषी ठरवले. शेठ यांनी आरोप मान्य करत माफीची मागणी केल्याने त्यांना ५ हजारांचा दंड ठोठावला.
जीवाला धोका निर्माण करणारी कृती
मानवी जीवन, आरोग्य किंवा सुरक्षिततेला धोका निर्माण करणारी कृत्ये केल्याबद्दल तसेच सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल भारतीय न्याय संहिता कलम २२३ (ब) अंतर्गत त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता तसेच मानवी जीवनासाठी धोकादायक आजारांचा संसर्ग पसरवण्याची शक्यता असल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.