
मुंबई महापालिकेच्या माध्यमातून विविध प्रकल्प राबवण्यात येत आहेत. या प्रकल्पात बाधितांना घरे देणे बंधनकारक आहे; मात्र खाजगी जागांवर बांधण्यात येणाऱ्या सदनिका निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप मुंबई महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे. या गैरव्यवहार प्रकरणी लोकायुक्तांकडे तक्रार केली पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे.
नाला रुंदीकरण, रस्ते प्रकल्प, नद्यांचे पुनर्जीवित करणे अशी विविध कामे मुंबई महापालिकेच्या माध्यमातून सुरु आहेत. या कामात अनेक कुटुंबे बाधित होत असल्याने त्यांना विनामूल्य घरे देणे बंधनकारक आहे. मुंबई महापालिकेसह विविध प्राधिकरणाच्या माध्यमातून ३०० हुन अधिक प्रकल्प राबवण्यात येत आहेत. त्यामुळे भविष्यात प्रकल्प बाधितांना घरे देण्यासाठी २९ हजार सदनिकांची गरज असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्रकल्प बाधितांसाठी खासगी जागा मालकांमार्फत सदनिका उपलब्ध करून घेण्याकरिता, जागेचा तसेच बांधकामाचा हस्तांतरणीय विकास हक्क आणि अधिमूल्य यांचा समावेश करून निविदा मागवल्या होत्या; मात्र या निविदांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप रवी राजा यांनी केला होता. तसेच या प्रकरणी लोकायुक्तांकडे तक्रारही केली होती. त्यांच्या तक्रारीवरून लोकायुक्तांनी या प्रकरणी ११ ऑक्टोबर रोजी सुनावणी ठेवली आहे.