नवरात्रोत्सवात सर्वत्र चैतन्याचे वातावरण पसरले आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे नवी मुंबई जुईनगर येथील जय भवानी मित्र मंडळ. या मंडळाचे यंदाचे २२वे वर्ष असून अंबे मातेवर अपार श्रद्धा असणाऱ्या या मंडळाने व ग्रामस्थांनी उत्सवाला जत्रेचे स्वरूप दिले आहे. उत्सवासोबत भक्तांची करमणूक म्हणून शहरातील सर्वात भव्य जत्रा या मंडळाकडून आयोजित करण्यात आली आहे.
कोरोनानंतर नवरात्र उत्सवाचे निर्बंधमुक्त पहिलेच वर्ष असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण पसरले आहे. नवी मुंबई जुईनगर येथील जय भवानी मित्र मंडळाने देखील यंदाच्या उत्सवासाठी विशेष तयारी केली. घटस्थापनेपासून प्रत्येक दिवशी ग्रामस्थांकडून, महिलांकडून नित्यनेमाने अंबे मातेची पूजा, नैवेद्य दाखवण्यात येतो. सर्वानी एकत्र यावे, आपली जातपात गरीब-श्रीमंत हे सर्व विसरून एक भक्त म्हणून सर्वानी अंबे मातेच्या चरणी नतमस्तक व्हावे, यासाठी सर्वांसाठी भंडारा आयोजित करण्यात येत असल्याचे मंडळाचे अध्यक्ष शरद भोईर यांनी सांगितले. होणाऱ्या भंडाऱ्यातून अन्नदान मोठ्या प्रमाणात होत असल्याने एक वेगळाच आनंद प्राप्त होत असल्याचेही भोईर यांनी सांगितले.
जय भवानी मित्र मंडळ गेल्या २२ वर्षांपासून देवीची प्रतिष्ठापना करत आहेत. मानाची असणारी ही देवी परिसरातील नागरिकांसाठी श्रद्धेचे स्थान आहे. उत्सवादरम्यान मागील अनेक वर्षांपासून महिलांसाठी लहान मुलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. तसेच शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येतो. याशिवाय मेडीकल कॅम्प, रक्तदान यांसारखे सामाजिक उपक्रम मंडळाकडून राबवण्यात येतात. तसेच आयोजित जत्रेत नऊ दिवसात २ हजारांहून अधिक येत करमणुकीत सहभाग घेत असल्याचे भोईर यांनी सांगितले.