Manoj Jarange : मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेली डेडलाईन बदलली? स्पष्टीकरण देताना म्हणाले...

आज यवतमाळ जिल्ह्यातील पुसदमध्ये मनोज जरांगे, ओबीसी, धनगर आणि बारा बलुतेदार, अलुतेदार आणि भटके विमुक्त यांच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली आहे.
Manoj Jarange : मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेली डेडलाईन बदलली? स्पष्टीकरण देताना म्हणाले...

राज्यात मराठा आरक्षणाचा विषय गेल्या अनेक महिन्यांपासूनच सुरूच आहे. अशातच मराठा आरक्षण दोन दिवस उशिरा मिळाले तरी चालेल. पण सर्व शांततेने करू, असे वक्तव्य मनोज जरांगेंनी केलं आहे. यानंतर जरांगे यांनी मराठा आरक्षणाची डेडलाईन बदलली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आज यवतमाळ जिल्ह्यातील पुसदमध्ये मनोज जरांगे, ओबीसी, धनगर आणि बारा बलुतेदार, अलुतेदार आणि भटके विमुक्त यांच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली आहे. यावेळी मराठा आंदोलक जरांगे यांनी 'एबीपी माझा'ला प्रतिक्रिया देताना आधीच्या वक्तव्यावर सारवासारव केली आहे.

मनोज जरांगे म्हणाले आहेत की, माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढू नका. डेडलाईन बदलण्याचा प्रश्नच नाही. मी बोलीभाषेतले शब्द वापरल्याने गैरसमज होऊ देऊ नये. 24 डिसेंबर ही डेडलाईन कायम आहे, असं जरांगे यांनी सांगितलं आहे. पुढे जारांगेंनी सांगितलं आहे की, मराठा आणि ओबीसी आता हातात हात घालून काम करणार आहे, यासाठीच पुसदच्या बैठकीत चर्चा झाली आहे . कुणाच्याही आरक्षणाला हात न लावता मराठ्यांना आरक्षण हवं ही माझी भूमिका नाही आहे. माझ्या तोंडी कोणतेही शब्द घालू नका. मला ओबीसीमधूनच सरसकट आरक्षण हवे आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

यावेळी मनोज जरांगे मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधत म्हणाले की, ''येवल्याचा म्हणतो आरक्षणाची एसटी पुर्णपणे भरलेली आहे. आम्हाला त्यात डोकावून तर पाहू देत. तू गाडीच्या काचा बंद केल्यात. ते स्वत:ला ओबीसींचा नेता म्हणत असतील तर त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळीच शिफारस करायली हवी होती. वेगळा प्रवर्ग तयार करून हे (मराठा समाज) माझेच भाऊ आहेत, माझ्याच ओबीसीतल आहेत, त्याचं लगेच वेगळं करा. त्यांना लगेच भांडायची काय गरज होती . त्यांचे हे भाऊ आहेत ना, जे त्यांना सभेला गर्दी करायला लागतात. पण, त्यांची पोरं-बाळं उघड्यावर पडणार असली तर, यांना वेगळं आरक्षण द्यायला काय अडचण आहे.'' असा प्रश्न मनोज जरांगे यांनी भुजबळांवर उपस्थित केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in