मुंबई : मुंबईतील भविष्यातील वाढत्या पाण्याची गरज लक्षात घेता, मुंबई महापालिकेने मनोरी येथे समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत पाणीपुरवठा करण्यासाठी भूमिगत जलवाहिनीचे जाळे विस्तारले जाणार आहे. यासाठी चारकोप आणि पुढे महावीरनगर (कांदिवली) पर्यंत १२८ मीटर खोल जमिनीखाली बोगदा खोदण्यात येणार आहे.
मनोरी निःक्षारीकरण प्रकल्पात समुद्रात दोन किमी लांबीचे दोन बोगदे पाणी आणणे व पाणी सोडण्यासाठी बांधावे लागणार आहेत. या प्रकल्पातून समुद्राच्या पाण्यावर प्रक्रिया करून पहिल्या टप्प्यात दररोज २०० दशलक्ष लिटर, तर दुसऱ्या टप्प्यात २०० दशलक्ष लिटर असे एकूण ४०० दशलक्ष लिटर पाणी मुंबईकरांना मिळणार आहे.
मनोरी निःक्षारीकरण प्रकल्पासाठी तीन हजार ५२० कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. प्रकल्प चार वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. हा बोगदा जमिनीखाली सुमारे १०४ ते १२८ मीटर खोलीवर खोदण्यात येणार असून त्याचा अंतर्गत व्यास १०.०५३ मीटर असेल. हा बोगदा आधुनिक टनेल बोरिंग मशीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तयार केला जाणार आहे. त्यामुळे पृष्ठभागावरील वाहतूक आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर कमीत कमी परिणाम होईल, असा पालिकेचा दावा आहे.