राज्यात मोठ्या धुम धडाक्यात गणेशोत्वस साजरा करण्यात आला. मात्र गणपती विसर्जनाच्या मिरवणूकीत एक धक्कादायक घडना समोर आली आहे. कांदिवलीत परप्रांतीय टोळक्याकडून एका मराठी तरुणाला बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कांदिवलीलच्या क्रांतीनगरमध्ये जय श्री राम म्हणण्यास नकार दिल्याबद्दल या तरुणाला परप्रांतील मुलांनी मारहाण केली आहे.
या प्रकरणातील आरोपी तरुण हे बजरंग दलाशी संबंधित असल्याचंही सांगितलं जात आहे. आता या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील परप्रांतीय चार जणांवर पोलिसांनी शांतता भंग केल्याप्रकरणी आणि दुखापत प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. कुरार पोलिस ठाण्यात २७ सप्टेंबर रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार सिद्धार्थ आंगुरे कामावरुन घरी येत असताना चार जणांनी त्यांचा रस्ता रोखला. यावेळी परप्रांतीय तरुणांनी त्यांना जय श्री राण म्हणण्याची मागणी केली. सिद्धार्थने ते करण्यास नकार दिला. आरोपींनी त्यांच्या धार्मिक संबंधांवर प्रश्न उपस्थित करत त्याला शिवीगाळ करत त्याच्यावर हल्ला केला. यानंतर सिद्दार्थ यांनी त्यांच्या भावाला फोन करुन याबाबतची माहिती दिल्यानंतर त्यांनी येऊन सिद्धार्थची टोळक्याच्या तावडीतून सुटका केली.
अंगुरे यांना यानंतर उपचारासाठी कांदिवली पश्चिम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांनी डिस्चार्जनंतर कुरार पोलीसांत चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी चार पैकी दोन हल्लेखोर सूरज तिवारी आणि कबीर मिश्रा यांना अटक केली असून अरुण पांडे आमि राजेश या रिक्षाचालकाला पकडण्यात त्यांना यश आलं नाही.
मुंबई काँग्रेसकडून या घटनेचा निषेध केला गेला आहे. "मुंबईकर हे सहन करणार नाहीत," अशा आशयाचं ट्विट मुंबई काँग्रेच्या वतिने करण्यात आलं आहे. या प्रकरणातील पीडिताच्या मदतीला वंचित बहुजन आघाडी धाऊन आली असून त्यांनी त्यांनी हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यास मदत केली. वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि सुजात आंबेडकर यांनी पोलिसांशी बोलून याप्रकरणी योग्य कारवाईची मागणी केली आहे.