मुंबई : राज्यातील महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. विविध विधाने करून नेते मतदारांना आपलेसे करू पाहत आहेत. यातच "मराठी माणसा जागा हो" या आशयाचे पोस्टर्स दक्षिण मुंबईत ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत.
पोस्टर्सच्या माध्यमातून मराठी माणसांना साद घालण्याचा प्रयत्न करण्यात आला असून या पोस्टर्सवर कोणाच्याही नावाचा उल्लेख नाही. हे पोस्टर्स आता विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक शेअर करू लागल्याने महापालिका निवडणुकीत मराठीचा मुद्दा महत्वाचा ठरणार आहे.
मुंबईत मराठी भाषिकांवर अन्याय होत असल्याचा आरोप होतो. यावरून राजकारण होत असतानाच मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्यात येणार असल्याचा आरोप राजकीय पक्ष करत असतात. यातच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि मनसेची आघाडी झाल्याने या निवडणुकीत मराठीचा मुद्दा पुढे आला आहे.
पालिका निवडणुकीत मराठीच्या बाजूने मतदान व्हावे यासाठी दक्षिण मुंबईत ठिकठिकाणी "मराठी माणसा जागा हो", तुझी मुंबई तुझ्यापासून तोडली जात आहे, यावेळी तुला मराठीसाठी एकत्रित यावे लागेल, अशा आशयाचे पोस्टर्स भायखळा, लालबाग, परळ, दादर परिसरात काही ठिकाणी लागले आहेत. पायाखालची जमीन एकदा गेली की ती परत मिळत नसते, मराठी माणसा मुंबई वाचव, असेही पोस्टर झळकविण्यात आले आहेत.