मुंबईत भाजपचाच महापौर - आशिष शेलार

जेव्हा कधी मुंबई महापालिकेच्या निवडणुका होतील, तेव्हा आम्ही 151 जागा जिंकू
मुंबईत भाजपचाच महापौर - आशिष शेलार

देशाच्या आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर आपला झेंडा फडकवण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत हे वारंवार सरकारला महापालिका निवडणुका घेण्यासंदर्भात डिवचत आहेत. आज देखील राऊत यांनी महापालिका निवडणुका घेण्यास का घाबरत आहात? हिंमत असेल तर लावा निवडणुका! असे आव्हान भाजपसह शिंदे गटाला दिले आहे. हे 150 जागा जिंकण्याचे स्वप्न बघत आहेत. पण आम्ही यांना 60 वर ऑल आउट करु, असे देखील राऊत म्हणाले. राऊत यांच्या टीकेला उत्तर देताना भाजपचे नेते मनोज कोटक यांनी मुंबई पालिकेत भाजपचाच महापौर होणार असल्याचे वक्तव्य केले. कोटक यांचे वक्तव्य चर्चेत असताना आता मुंबईचे भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी देखील याच प्रकारचे वक्तव्य केले आहे.

मुंबई येथील भाजपच्या कार्यकारणी बैठकीला संबोधित करताना शेलार म्हणाले की, "जेव्हा कधी मुंबई महापालिकेच्या निवडणुका होतील, तेव्हा आम्ही 151 जागा जिंकू, भाजप शिवसेना (शिंदे गट) आणि रिपाईसह एनडीएच्या 151 जागा निवडून येतील आणि भाजपचा महापौर बसेल. यासाठी तुम्ही तुमची सगळी ताकद लावा." अशी विनंती शेलार यांनी कार्यकर्त्यांना केली. यावेळी त्यांनी ठाकरे गटाला मुंबईकरांनी नाकारले आहे. झिडकारले आहे. त्यांना आपले म्हणण्याचे टाळले आहे. आपल्याला मुंबईत भाजपचे मिशन 150 चे स्वप्न पुर्ण करायचे आहे, असे म्हणत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला.

शेलार यांच्या महापौर पदाच्या विधानाबाबत शिवसेनेचे (शिंदे गट) मंत्री उदय सामंत यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "मुंबई महापालिकेच्या महापौर पदाबाबतचे निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घेतील. राज्यातील सर्वच महापालिकांबाबचा निर्णय ते घेतील. यावर मी बोलून उपयोग नाही. दोन्ही नेते परिपुर्ण राजकारणी असून दोन्ही पक्ष परिपक्व आहेत. ते वायफळ बोलत नाहीत." अशी कोपरखळी त्यांनी शेलार यांना मारली. तसेच मी जर साताऱ्यात 288 जागा लढवण्याचे वक्तव्य केले, तर ते कार्यकर्त्यांचे प्रोत्साहन वाढवण्यासाठी नेत्याने केलेले वक्तव्य असेल, असे देखील ते यावेळी म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in