देशाच्या विविध राज्यांत ‘अग्निपथ’ योजनेविरोधात हिंसक निदर्शने होत आहेत. या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालयाने अग्निवीरांना आपल्या खातेनिहाय भरत्यांमध्ये १० टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. संरक्षण मंत्रालयाच्या इंडियन कोस्ट गार्ड व डिफेन्स सिव्हिलियन पोस्टसह डिफेन्स पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगच्या १६ कंपन्यांतील नियुक्त्यांत अग्निवीरांना आरक्षण मिळेल.
तत्पूर्वी, गृह मंत्रालयानेही केंद्रीय सशस्त्र पोलीस दल व आसाम रायफल्समधील भरतीत अग्निवीरांना १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. मंत्रालयाने वयोमर्यादेतही ३ ते ५ वर्षांची सूट देण्याची घोषणा केली आहे. तसेच बँका, विमा कंपन्या, राज्य सुरक्षा दल, कॉर्पोरेट कंपन्या, मर्चंट नेव्हीमध्ये अग्निवीरांना प्राधान्य देण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले. तसेच त्यांना पुढील शिक्षणासाठी विशेष सुविधा व कर्ज योजनाही उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. बिहारमध्ये आंदोलनाच्या शनिवारी चौथ्या दिवशी पाटणामधील मसौधी येथील टारगेना स्टेशनजवळ दगडफेक आणि गोळीबार झाला. आंदोलकांनी रेल्वे स्थानकाची तोडफोडही केली. तसेच पार्किंगमध्ये उभी असलेली वाहने पेटवून देण्यात आली व पोलिसांवर दगडफेक केली. रेल्वेगाड्यांना लक्ष्य करण्यात येत असल्याने बिहारमध्ये रात्री ८ ते पहाटे ४ या काळातच रेल्वेगाड्या धावतील, असे रेल्वेने जाहीर केले आहे.