

भाईंंदर : मीरा-भाईंदरकरांची बहुप्रतीक्षित मेट्रोची वाट अखेर संपली असून दहिसर ते काशीगाव या मुंबई मेट्रो लाइन ९ मार्गिकेचा पहिला टप्पा शुक्रवार, ३ एप्रिलपासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर श्रेयवादावरून सत्ताधारी पक्षांतही चढाओढ सुरू झाली आहे.
दहिसर ते भाईंदर पश्चिम (सुभाषचंद्र बोस मैदान) या संपूर्ण मार्गिकेच्या कामाला झालेला विलंब लक्षात घेता मेट्रो दोन टप्प्यांत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पहिल्या टप्प्यात दहिसर ते मीरारोडच्या काशीगावपर्यंत सेवा सुरू केली जाणार आहे.
या टप्प्यात दहिसर, पांडुरंग वाडी, मीरागाव आणि काशीगाव अशी चार स्थानके प्रवाशांसाठी खुली राहणार आहेत. प्लेझंट पार्क, विनय नगर, हटकेश आदी भागातील प्रवाशांना काशीगावहून दहिसरपर्यंत थेट मेट्रो सेवा उपलब्ध होणार आहे.
या प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पार पडण्याची शक्यता असून कार्यक्रम ऑनलाईन होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी मेट्रोमुळे मीरा-भाईंदर अधिक प्रगतिशील होईल, असा विश्वास व्यक्त केला. तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जनतेला दिलेल्या वचनपूर्तीचा हा सुवर्ण क्षण असल्याचे सांगत, गेल्या अनेक वर्षांच्या प्रयत्नांचे हे फलित असल्याचे नमूद केले.
सध्या मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वेतील प्रचंड गर्दी आणि दहिसर चेकनाक्यावरील वाहतूककोंडी यामुळे नागरिक त्रस्त आहेत. या पार्श्वभूमीवर मेट्रोच्या पहिल्या टप्प्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या काशीगाव ते दहिसर असा प्रवास सुलभ होणार असून पुढील टप्प्यात ही मेट्रो थेट भाईंदरपर्यंत आणि पुढे आणखी विस्तारण्याची योजना आहे.