

भाईंंदर : मीरा-भाईंदर शहरात संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी शहरात पाणी कपात लागू करण्यात आली आहे. जलसंपदा आणि पाटबंधारे विभाग यांच्या निर्देशानुसार, स्टेम प्राधिकरण आणि एमआयडीसीकडून आठवड्यातून एक दिवस पाणी कपात केली जाणार आहे. या निर्णयामुळे चालू आठवड्यात बुधवार, १ जुलैपासून शहराचा पाणीपुरवठा २४ ते ४८ तासांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे.
संभाव्य पाणी संकट ओळखून प्रशासनाने आतापासूनच पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मीरा-भाईंदर शहरात गेल्या काही दिवसांपासून भीषण पाणीटंचाई सुरू आहे. पूर्वी एक दिवस पाणीपुरवठा बंद असताना शहरातील नागरिकांना ४० ते ५० तासांवर पाणीपुरवठा केला जात होता. आता दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने आणखी भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. मीरा-भाईंदर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या स्टेम प्राधिकरणकडून बुधवार, १ जुलै राेजी सकाळी ९ वा.पासून ते गुरुवार, २ जुलै रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत असा २४ तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
एमआयडीसीकडून बुधवार, १ जुलै राेजी रात्री १२ वा.पासून ते शुक्रवार, ३ जुलै रोजी रात्री १२ वाजेपर्यंत असा ४८ तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. पाणीपुरवठा बंदचा कालावधी संपल्यानंतरही शहरात पुढील काही दिवस कमी दाबाने आणि उशिराने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मीरा-भाईंदर महापालिकेच्या पाणीपुरवठा व मलनि:सारण विभागाचे कार्यकारी अभियंता शरद नानेगावकर यांनी नागरिकांना पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आणि पाणी बचतीसाठी पालिकेला पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
४८ ऐवजी २४ तास पाणी कपात करावी
डोंबिवली : डोंबिवलीतील पाणी कपात आठवड्यातून एकदा सलग ४८ तास न ठेवता ती २४ आणि २४ तास अशी विभागून करावी, अशी मागणी डोंबिवली एमआयडीसी कार्यालयात निवासीमधील नागरिकांच्या शिष्टमंडळाने केली आहे. नागरिकांच्या शिष्टमंडळाने अधीक्षक आणि कार्यकारी अभियंता यांच्या नावाने पत्र दिले आहे. त्यात निवासीमधील नागरिकांनी सह्या केल्या आहेत. हे पत्र कार्यकारी अभियंता श्रीकांत राऊत यांना देऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. तुमच्या मागणीची दखल घेऊन ती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविली जाईल.