
मुंबई : मिठी नदी गाळ काढण्यात ६५ कोटींपेक्षा जास्त घोटाळा प्रकरणात अटकेत असलेल्या २ दलालांना जामीन देण्यास मुंबई न्यायालयाने सोमवारी नकार दिला. या दलालांना जामीन मंजूर केल्यास चौकशीमध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे न्यायालयाने नमूद केले.
अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी मागील आठवड्यात आरोपी केतन कदम आणि जय जोशी यांच्या जामीन अर्जास नकार दिला होता.
सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने नमूद केले की, जर आरोपींना जामिनावर सोडण्यात आले, तर चौकशीत अडथळे निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आम्ही निर्दोष असून आमच्यावर खोटे आरोप लावण्यात आल्याचा दावा या दोन्ही आरोपींनी आपल्या जामीन अर्जात केला आहे.
कदम यांनी असा दावा केला की, पुरवणीची संपूर्ण केस दस्तावेजांवर आधारित आहे आणि त्यामुळे त्यांना कोठडीत ठेवण्याची गरज नाही. त्यांना एकही रुपया मिळालेला नसून त्यांना बळीचा बकरा करण्यात आले आहे, असे त्यांनी अर्जात नमूद केले.
जोशी यांच्या अर्जात म्हटले आहे की, त्यांनी कुठलाही गैरव्यवहार केलेला नाही. ते केवळ एक गुंतवणूकदार व अर्थपुरवठा करणारे असून, त्यांनी केवळ यंत्रसामग्री ठेकेदारांना पुरवली होती.
या प्रकरणी या महिन्यात पोलिसांनी १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यात काही ठेकेदार आणि महापालिका अधिकारी यांचा समावेश आहे. पालिका अधिकाऱ्यांनी ही निविदा विशिष्ट यंत्रसामग्री पुरवठादाराच्या फायद्यासाठी बनवली होती, असा आरोप आहे. तसेच, ठेकेदारांनी मुंबईबाहेर गाळ नेण्यासाठी खोटी बिले तयार केली. या घोटाळ्यामुळे महापालिकेला ६५.५४ कोटींपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
दिनो मोरीयाची चौकशी
मिठी नदीचा गाळ काढण्याच्या प्रकल्पातील कथित गैरव्यवहार प्रकरणात अभिनेता दिनो मोरीयाची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी चौकशी केली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, दिनो सकाळी जवळपास ११ वाजता चौकशीसाठी कार्यालयात पोहचला. दिनो आणि त्याचा भाऊ सैंटिनो यांची या प्रकरणातील मुख्य आरोपी केतन कदम याच्याशी काही कनेक्शन आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.